Rajmata Jijau Jayanti Marathi Speech: राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती (तिथीप्रमाणे) मराठी भाषण

Rajmata Jijau Jayanti Marathi Speech: राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती (तिथीप्रमाणे) मराठी भाषण

आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राजमाता जिजाऊ यांची 25 जानेवारी रोजी (तिथीप्रमाणे) जयंती आहे.
Published by :
Team Lokshahi

आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राजमाता जिजाऊ यांची 25 जानेवारी रोजी (तिथीप्रमाणे) जयंती आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार, त्यांचा वाढदिवस 12 जानेवारीला असतो. तर मराठी दिनदर्शिकेनुसार पौष पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. ह्यांचा विवाह 1605 साली शहाजीराजेंशी दौलताबाद येथे झाला. ह्यांना एकूण 8 अपत्ये झाली. 6 मुली आणि 2 मुले. थोरल्या मुलाचे नाव त्यांनी आपल्या दिरांच्या नावावर संभाजी ठेवले. संभाजी शहाजीराजांकडेच वाढले. मात्र शिवाजी महाराजांना ह्यांनीच वाढविले. यासाठी आपण आज मराठी भाषण पाहणार आहोत.

मराठी निबंध

राजमाता जिजाऊ म्हणजे शिवबांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घडविणारी एक धैर्यवान आणि वीर माता. ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक श्रीमंत शिवाजी महाराजांच्या मातोश्री होय. ह्यांना जिजामाता, जिजाऊ, राजमाता, आणि माँ साहेब अशा नावांनी पण संबोधित करत असे. 19 फेब्रुवारी 1630, फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551 या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली त्याचें नावं ठेवले शिवाजी. जिजाबाईंनी दिलेल्या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. त्यांना राजनीतीचे सखोल ज्ञान ही दिले. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याचे बघून राज्याभिषेकाच्या 12 दिवसांनी 17 जून इ.स 1674 रोजी वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. रायगढ़च्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात जिजामातांची समाधी आहे. त्यांच्या मनात असलेल्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रात्यक्षिक करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन आणि पराक्रम अशा सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या अशा ह्या राजमाता होत्या. पुण्याचा विकास, राज्यकारभार हाताळणे, शेतकऱ्यांना मदत करणे, तंटे सोडवणे, यांसारख्या जवाबदाऱ्या पार पाडताना त्या शिवाजी महाराजांच्या जडण घडण कडे देखील बारकाईने लक्ष देत होत्या.

महाराष्ट्र जशी वीर पुत्रांची भूमी आहे तशीच वीर मातांची देखील आहे हे राजमाता जिजाऊंना बघून लक्षात येते. जिजाबाईंनी इतिहासातील अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, जे मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी उपयुक्त ठरले. जिजाबाई एक हुशार आणि कर्त्यव्यनिष्ठ स्त्री होत्या. आयुष्यभर अडचणी आणि प्रतिकूल परिस्थितीतही त्याने संयम ठेवून योग्य निर्णय घेतले. जिजाबाई शिवाजींना प्रेरणादायी गोष्टी सांगून प्रेरणा द्यायच्या. त्याच्या प्रेरणेने शिवाजींनी स्वराज्यप्राप्तीचा निर्णय घेतला. त्यावेळेस शिवबा अवघे वय वर्ष 17 चे होते. शिवाजी महाराजांसारखे महान शासक घडविण्यासाठी जिजाऊंचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

छोटेखानी मराठी भाषण निबंध

आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राजमाता जिजाऊ यांची तारखेनुसार 426 वी जयंती आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, मात्र त्यासाठी त्यांना मॉं साहेब जिजाऊ यांनी प्रेरित केले. जिजाऊंनीच त्यांना स्वराज्याची वाट दाखवली. याच प्रेरणेमुळे स्वराज्याचा पाया रचला गेला. जिजाऊंच्या संस्कारात शिवाजी महाराजांचे संगोपन झाले आणि यातूनच त्यांना आपल्या दीनदुबळ्या शोषीत कष्टकरी प्रजेसाठी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली.

जिजाऊंच्या वडिलांचे नाव लघुजी जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते. जिजाऊंना चार भाऊ होते. दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि महादुजी असे जिजाऊंच्या भावांची नावे होती. जिजाऊ दांडपट्टा आणि अश्वारोहण या युद्ध कलांमध्ये पारंगत होत्या. डिसेंबर 1605 मध्ये त्यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद येथे झाला. शहाजी राजे निजामशाहीचे सरदार होते. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंनी शिवबांना जन्म दिला. जिजाऊंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली तर दोन मुले होती. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले.

शिवबांना त्यांनी लहानपणीच रामायण, महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज युद्ध कला शिकले.गरिब रयतेच्या सुखासाठी स्वतंत्र स्वराज्य बनवावे ही आऊंसाहेबांची इच्छा होती. 23 जानेवारी 1664 साली शहाजी राजे यांचे देखील निधन झाले. मात्र पतीच्या निधनानंतर देखील जिजाऊंनी हार मानली नाही. त्या जीद्दीने पुन्हा उभ्या राहिल्या. स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर छत्रपती संभाजी महारांजांचे संगोपन देखील जिजाऊंच्या संस्कारातच झाले.17 जून 1674 रोजी जिजाऊंची प्राणज्योत मावळली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com