विशेष महत्व असलेले ‘हरितालिके’चं व्रत का करतात?
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतियेला हरतालिकेचं व्रत महिला करत असतात. अनेक राज्यांमध्ये याला तीज असंही म्हणतात. हे व्रत भगवान शंकराला आणि माता पार्वतीला समर्पित आहे. पौराणिक मान्यतेनुसार कुमारी कन्या हे व्रत चांगला मनासारखा पती मिळण्यासाठी करतात. तर लग्न झालेल्या महिला हे आपलं सौभाग्य अबाधित राहावं, यासाठी हरतालिकेचं व्रत करत असतात. हे व्रत करूनच माता पार्वतीनं आपला मनासारखा वर म्हणजेच भगवान शंकराची प्राप्ती केली होती. हे व्रत कुमारिकेपासून लग्न झालेल्या महिलांपर्यंत केलं जातं. विशेष म्हणजे हे व्रत दरवर्षी न चुकता केलं जातं. सौभाग्यप्राप्तीसाठी आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी अनेकजणी हे व्रत निर्जळी किंवा उपाशी राहून करताना दिसतात.
दक्षकन्या श्यामवर्णा काली हिला शंकराने सर्वादेखत ‘काळी असलीस तरी मला तू खूप आवडतेस’ असे म्हटले. त्यामुळे कालीने चिडून हिरवळीवर स्वत:ची हरित सावली फेकली आणि अग्निप्रवेश करून ती हिमालयाची कन्या गौरी म्हणून जन्माला आली. तर सावलीतून ‘कात्यायनी’ देवी निर्माण झाली. पुढे युद्धात ‘कात्यायनी’ देवीने देवांना मदत केली, ती नंतर ‘हरिकाली’ नावानं ओळखली जाऊ लागली. त्यामुळे भाद्रपद शुक्ल तृतीयेला काही ठिकाणी हरिकालीचेही व्रत केलं जातं. फक्त स्त्रियाच नाही पुरुष देखील तिची पूजा करतात. यात सुपामध्ये सात धान्ये पेरून त्यांचे अंकुर आले की त्यावर देवीचे आवाहन करून पूजन केले जाते. त्यानंतर पहाट उजाडायच्या आत तिचं विसर्जन करण्याची देखील प्रथा आहे.
हरतालिकेच्या पुजेला लागणारं साहित्य
हरतालिकेच्या पूजेसाठी रेती, बेल पत्र, शमी पत्र, आंब्याची पानं, पांढरे फुलं, वस्त्र, तसंच १६ प्रकारच्या पत्री , पूजेसाठी फुलं, तसंच सौभाग्याचं साहित्य म्हणजेच बांगड्या, काजळ, कुंकू, श्रीफळ, कलश, चंदन, तूप, तेल, कापूर, साखर, दुध, मध, दही म्हणजेच पंचामृत इत्यादी साहित्य पूजेसाठी तयार ठेवावं.