मेळघाटात पाच महिन्यात 110 बालकांचा मृत्यू
सुरज दाहट|अमरावती : जिल्ह्यातील मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात कुपोषणासह विविध आजाराने एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात दोन मातासह शून्य ते सहा वयोगटातील 77 व 33 उपजत अशा 110 बालकांचा मृत्यू झाला. पाच महिन्यात 2,525 बालकांचा जन्म झाला आहे. तर धक्कादायक म्हणजे मागील ऑगस्ट महिन्यात 36 बालकांचा जन्म झाला, यात 19 बालकांचा मृत्यू धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे आदिवासींनी बालकांचा उपचार कुठे करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कुपोषणाच्या तीव्र श्रेणीत 232 बालके आहेत, असे असताना 14 ब गट डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याचा संताप जनक प्रकार आहे.
मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यात आदिवासी बालकांच्या कुपोषणाचा गंभीर प्रश्न असताना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, न्यायालयाचे ताशेरे, पाहता मृत्यूची आकडेवारी कमी होण्याचा नाव घेत नसल्याचे चित्र आहे. एप्रिल ते ऑगस्ट महिन्याच्या 150 दिवसात एकूण 110 मृत्यू पैकी सर्वाधिक 36 बालकांचा मृत्यू ऑगस्ट महिन्यात झाला आहे. तर या पाच महिन्यात दोन माता मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे आहे पावसाळ्यात जलजन्य रोगाचा प्रादुर्भाव मेळघाटात होतो.
शून्य ते सहा वयोगटातील 77 बालकांचा मृत्यू
मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन्ही तालुक्यात शून्य ते सहा वयोगटातील पाच महिन्यात 77 बालकांचा मृत्यू झाला असून एकट्या ऑगस्ट महिन्यातील दोन्ही तालुक्यांमध्ये 2,525 बालकांचा जन्म झाला त्यापैकी शून्य ते सहा वयोगटातील 27 बालक दगावली.
33 बालक मृत जन्मली
आरोग्य विभाग बालकांच्या मृत्यूच्या आकडेवारीत शून्य ते सहा वयोगटातील आकडेवारी सांगत असली तरी उपजत अर्थात मृत जन्मलेल्या बालकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे मागील पाच महिन्यात ती 36 एवढी असून ऑगस्ट महिन्यात नऊ पालकमृत जन्मले त्यामुळे राज्य शासनाचा पोषण आहार व इतर योजना कुचकामी ठरल्याचा ठपका आकडेवारीने पुढे आला आहे.
उपजिल्हा रुग्णालयात 19 मृत्यू
मेळघाटातील दुर्गम व अति दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथे उपचार व्यवस्थित होत नसल्याने धारणी येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापित करण्यात आले आहे. तेथे ऑगस्ट महिन्यात शून्य ते सहा वयोगटातील बारा तर उपजत सात अशा 19 बालकांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार आहे, तर त्या खालोखाल टेब्रुसोंडा आरोग्य केंद्र अंतर्गत शून्य ते सहा वयोगटातील सहा बालके दगावली.
14 डॉक्टरांच्या जागा रिक्त
मेळघाटातील आरोग्य केंद्रामध्ये स्त्रीरोग बालरोग तज्ञ डॉक्टरांची कमतरता असतानाच 14 ब गट डॉक्टरांच्या जागा रिक्त असून 28 परिचारिका व सुपरवायझर यांची प्रकरणे न्यायप्रविष्ठ असल्याने आदिवासी बालकांचा रुग्णांवर उपचार करणारे कर्मचारी डॉक्टरांची त्या जागा किंवा भरल्या जाणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे
मागील वर्षाच्या तुलनेत बालमृत्यूची संख्या कमी आहे सततचा पाऊस त्यामुळे वातावरणात बदल आजार ऑगस्ट महिन्यात 0 ते 6 वयोगटातील 27 व उपजत नऊ बालकांचा मृत्यू झाला.आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे ब गट डॉक्टरांची 14 पदे रिक्त आहेत शासनाला अहवाल पाठवण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी -डॉ.दिलीप रणमले यांनी दिली.