Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; पत्रात काय?
थोडक्यात
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
'शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा'
शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत गरज
(Aaditya Thackeray ) राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टी, ढगफुटी आणि पुराने नागरिक हैराण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, 'राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या दुरावस्थेच्या संदर्भात मी आपणास कळवू इच्छितो की, मराठवाडयातील अनेक जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर शेतातील मातीच वाहून गेली आहे. अनेक शेतकऱ्यांचे जवळपास ५०% किंवा त्यापेक्षाही जास्त नुकसान झाले आहे. ही परिस्थिती अत्यंत दुःखद आहे आणि त्यावर त्वरित उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.'
'आपण आपल्या भाषणात, राज्यातील जनतेला योग्य वेळ येताच कर्ज माफी करण्याचे आश्वासन दिले होते. आता ती वेळ आलेली आहे, आणि राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत गरज आहे. माझ्या माहितीप्रमाणे, आधी झालेल्या नैसर्गिक आपत्तींच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडे जवळपास १५,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे, या थकबाकीचे वितरण लवकरात लवकर करण्याची ही अत्यंत आवश्यकता आहे.'
'माझ्या माहितीप्रमाणे, २,३३९ कोटी रुपयांच्या निधीला केवळ मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात मदतीचे वितरण करण्यासाठी बराच कालावधी लागेल. या परिस्थितीत, शेतकऱ्यांना त्वरित मदत पुरवण्यासाठी आणि योग्य वेळेत त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान ३३% पेक्षा जास्त झालेले असल्यामुळे नियमांनुसार पंचनाम्याची आवश्यकता नाही, सरसकट सर्व शेतकऱ्यांना मदत देणे, हे आपले कर्तव्य आहे. ज्याप्रकारचे नुकसान झालेले आहे त्याप्रमाणे व कुठल्याही प्रकारचे निकषांमध्ये न अडकता शेतकऱ्यांना अपेक्षित आणि गरजेची असलेली मदत तात्काळ करण्यात यावी.'
यासोबतच ते पुढे म्हणाले की,महोदय आपणास विनंती आहे की, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्वरित आणि प्रभावी पावले उचलावीत, जेणेकरून त्यांना योग्य वेळी मदत मिळू शकेल आणि त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल'. असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.