Aaditya Thackeray : आजच्या भाजप प्रणित केंद्र सरकारच्या बजेटमध्ये महाराष्ट्राचा साधा उल्लेखही केला गेल्याचं दिसलं नाही

Aaditya Thackeray : आजच्या भाजप प्रणित केंद्र सरकारच्या बजेटमध्ये महाराष्ट्राचा साधा उल्लेखही केला गेल्याचं दिसलं नाही

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामण यांनी सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी विशेष घोषणा केल्या आहेत. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

यावर आता आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, आजच्या भाजप प्रणित केंद्र सरकारच्या बजेटमध्ये महाराष्ट्राचा साधा उल्लेखही केला गेल्याचं दिसलं नाही! महाराष्ट्राला ही वागणूक का? महाराष्ट्राने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा आदर राखत तुमच्या संविधान विरोधी सत्तेला आळा घातला म्हणून? की महाराष्ट्राची जनता अजूनही स्वाभिमानी आहे म्हणून? की महाराष्ट्रावर ह्यांचा जूना आकस आहे म्हणून? बिहार आणि आंध्र प्रदेशला त्यांचा वाटा नक्की द्या, पण महाराष्ट्र सर्वात मोठा करदाता असूनही भाजपाचा महाराष्ट्रावर एवढा राग कश्यासाठी?

महाराष्ट्रातल्या ट्रिपल इंजिन सरकारला आपल्या राज्यासाठी ह्या बजेटमधून काय मिळवता आलंय? ना विशेष पॅकेज, ना निधी, ना हक्काचा वाटा! मिंधे राजवटीला फक्त दिल्लीसमोर लाचारी पत्करायला, महाराष्ट्रातले उद्योग परराज्यात पाठवायला, प्रचंड भ्रष्टाचार करुन राज्याची तिजोरी रिकामी करायला आणि फोडाफोडीचं राजकारण करायला जमतं! महाराष्ट्रासाठी केंद्राकडून निधी मिळवण्याची आणि राज्याचं भलं करण्याची धमकच ह्यांच्यात नाही! असे आदित्य ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com