अन्यथा अंधश्रद्धा पसरविण्यात सरकार सामील झाल्यासारखे वाटेल- तृप्ती देसाई
अमोल धर्माधिकारी | माळ काढणाऱ्यांना कोरोना गाठणारचं असे विधान इंदुरीकर महाराज यांनी केले होते. या विधानावर आता वादंग माजला आहे. भूमाता फाऊंडेशनच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई यांनी या विधानावर आक्षेप घेत इंदुरीकर महाराज यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
मी माळकरी आहे म्हणून मला कोरोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना कोरोना गाठणारचं असे सांगून किर्तनाच्या माध्यमातून इंदुरीकर अंधश्रद्धा पसरवत असल्याचे तृप्तीताई देसाई म्हणाल्या आहेत.तसेच इंदुरीकर पुन्हा एकदा असे वक्तव्य करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचाही घणाघाता त्यांनी केला.
कोरोना ही महाभयंकर महामारी असून सध्या तिसरी लाट आपल्या देशात आहे. याआधी अनेक जणांना कोरोनामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले आहे तर अनेक जण मृत्यूच्या दारातून बाहेर आले आहेत.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.त्यातच सरकार सुद्धा जनजागृती करत आहेच, परंतु स्वतःला कीर्तनकार म्हणविणारे इंदुरीकर पुन्हा एकदा असे वक्तव्य करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. सरकारमधील नेते आणि विरोधी पक्षातील नेते यांनी ठेवलेल्या प्रवचनाला इंदुरीकर यांना बोलविले जाते आणि गर्दी जमा होते, आता लवकरच निवडणुका आहेत केवळ म्हणूनच दरवेळी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न या सर्व नेत्यांकडून केला जातो,असे म्हणत त्यांनी सरकारवरही ताशेरे ओढले.
दरम्यान याआधी सुद्धा इंदुरीकर महाराज यांच्या कोरोनावरील वक्तव्यावर सरकारने कोणतीही कारवाई न करता सूट दिली होती. परंतु हिम्मत असेल तर आणि आपल्या राज्यात सर्वांना कायदा समान असेल तरच या सरकारने इंदुरीकरांवर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा अंधश्रद्धा पसरवण्यात सरकारसुद्धा सामील आहे असे जनतेला वाटेल, अशी टीका तृप्ती देसाई यांनी केली.