अहमदनगर हादरले; प्रसिद्ध मिठाई व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला

अहमदनगर हादरले; प्रसिद्ध मिठाई व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या आठ दहा दिवसांत राजकीय नेत्यांवर गोळीबार करण्याच्या घटना घडल्या.
Published by :
shweta walge

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या आठ दहा दिवसांत राजकीय नेत्यांवर गोळीबार करण्याच्या घटना घडल्या. गोळीबाराच्या घटना ताज्या असतानाच अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवरील किर्लोस्कर कॉलनीत मिठाई व्यावसायिक धीरज जोशी यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय.

काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. धीरज जोशी हे किर्लोस्कर कॉलनीत आले असता मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा अज्ञातांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. अज्ञात हल्लेखोरांकडे गावठी कट्टा आणि तलवारसारखे धारदार हत्यार होते. या हल्ल्यात धीरज जोशी हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनं अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली असून शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी घटनास्थळी पाहणी केली.

दरम्यान आमदार जगताप यांनी पोलिसांवर ताशेरे ओढले. व्यापाऱ्यावर हल्ले होतात, हल्लेखोरांकडे गावठी कट्टे असतात. हे गावठी कट्टे येतात कुठून असा सवाल उपस्थित करत याबाबत गृहमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. दरम्यान जोशी आणि हल्लेखोरांमध्ये झटापट झाल्याने हल्लेखोरांच्या हातातील गावठी कट्टा खाली पडला, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता असं प्रत्यक्षदर्शी जखमीच्या नातेवाईक हिने सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com