घर आणि दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरलेल्यांसाठी अजित पवारांची महत्त्वाची घोषणा; मिळणार मोठी मदत

घर आणि दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरलेल्यांसाठी अजित पवारांची महत्त्वाची घोषणा; मिळणार मोठी मदत

पुराचे पाणी घरात, दुकानात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आणि विधान परिषेदमध्ये मोठी घोषणा केली.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली असून पूरग्रस्तांना यंदा पाच हजार रुपयांऐवजी प्रतिकुटुंब दहा हजार रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत आणि विधान परिषेदतही केली.

घर आणि दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरलेल्यांसाठी अजित पवारांची महत्त्वाची घोषणा; मिळणार मोठी मदत
...अन्यथा आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल; सभागृहातच थोरातांचा सरकारला इशारा

राज्य आपत्ती प्रतिसाद मदत निधीच्या निकषांमध्ये दुकानांसाठी मदत अनुज्ञेय नसली तरी, अधिकृत दुकाने आणि टपरीधारकांनाही नुकसानीपोटी मगील वर्षाप्रमाणे मदत दिली जाईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात स्पष्ट केले. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून संपूर्ण राज्यातील अतिवृष्टी आणि पुरस्थितीचा आढावा घेण्यात येईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यात सुरु असलेल्या अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे असून बाधितांना मदत करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला. राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात निवेदन केले.

- अतिवृष्टी व पूरस्थितीकाळात नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाला दिलेल्या सूचना

- धोकादायक परिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे.

- पुरस्थितीमूळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी.

- शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत.

- ज्या ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असतील त्या ठिकाणी देखिल पंचनामे त्वरित सुरु करावेत.

- बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप तातडीने, त्याच दिवशी होईल याकरीता प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानांना पुरेसा धान्याचा पुरवठा करावा.

- ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते त्यांना सध्याच्या दराने पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी.

- रोगराई पसरु नये याकरीता स्वच्छता करणे, औषध फवारणी करणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात.

- ज्या ठिकाणी पाणी दुषित झाले आहे, त्याठिकाणी स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यकतेनुसार विहिरी अधिग्रहित कराव्यात.

- गरज असेल त्या ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा.

- ज्याठिकाणी अतिवृष्टीमुळे रस्त्यांची हानी झाल्याने गावांचा संपर्क तुटलेला आहे, अशा रस्त्यांची बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी.

- पुरामूळे ज्या शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले आहे त्यांना शिक्षण विभागाने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन द्यावे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com