"...अन्यथा जितेंद्र आव्हाडांविरोधात महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल"; अमोल मिटकरींनी दिला इशारा
Amol Mitkari On Jitendra Awhad : मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश न करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला. महाडमध्ये आव्हाडांनी मनुस्मृतीचं दहन करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडला. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे आणि अमोल मिटकरी यांनी आव्हाडांवर सडकून टीका केली आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी ?
डॉ. जितेंद्र आव्हाडांनी याबाबत माफी मागितली पाहिजे. एकप्रकारे हा देशद्रोह झाला आहे. मनुस्मृती आणि मनाचे श्लोक पाठ्यपुस्तकात टाकण्यात येणार नाहीत, हे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं. अजितदादांनी सांगितल्यावरही आव्हाडांनी स्टंटबाजी करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा फाडल्या आहेत. असं फुटेज समोर आलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या प्रतिमेचा हा अवमान आहे. हा देशाचाही अवमान आहे. जितेंद्र आव्हाडांनी या देशाची माफी मागावी. अन्यथा आव्हाडांविरोधात महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी म्हणाले.
आव्हाडांवर टीका करत आनंद परांजपे काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृतीचं दहन करताना अतिउत्साहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं, यावर प्रतिक्रिया देताना परांजपे म्हणाले, डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करावा तेव्हढा कमी आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशाप्रकारचे आंदोलन ते करत असतात. आज तर त्यांनी इतकं निषेधार्य कृत्य केलं आहे की, मनुस्मृती जाळताना परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडलेला आहे. बाबासाहेबांचा आणि तमाम दलितांचा अपमान आव्हाडांनी केला आहे. मनुस्मृीतीचे श्लोक पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमात येणार नाहीत, अशी राष्ट्रवादीनं स्पष्ट भूमिका घेतली आहे. संपूर्ण दलित समाजाने आव्हाडांचा निषेध केला पाहिजे.