विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही, राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष चिघळणार
विधानसभा अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेवरून सध्या राज्यातलं राजकारण चांगलंच पेटलं आहे. एकीकडे राज्यपालांना सरकारने पाठवलेल्या मंजुरी प्रस्तावावर अद्याप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निर्णय घेतलेला नसताना दुसरीकडे राज्य सरकार मात्र आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यावर ठाम आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही यावरुन अनेक चर्चा सुरू होत्या. त्याच दरम्यान आता या निवडणुकीच्या संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.
या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाहीये. थोड्याच वेळापूर्वी महाविकास आघाडी सरकारची एक बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्यावर महाविकास आघाडी सरकार ठाम होते. मात्र, मविआ सरकारने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावर राज्यपालांकडून अद्याप कुठलाही निर्णय आला नाही. त्यानंतर राज्यपालांच्या अनुमतीशिवाय निवडणूक घेण्याची चाचपणीही करण्यात आली. पण कुठल्याही कायदेशीर पेचात अडकू नये यासाठी राज्य सरकारने आज निवडणूक न घेण्याचं ठरवलं आहे.