संभाजीराजे छत्रपती यांचे महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र; पत्रात म्हणाले...

संभाजीराजे छत्रपती यांचे महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र; पत्रात म्हणाले...

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते.
Published by :
Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते. आता मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज्यभरात ते सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र लिहिलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे महाराष्ट्रात सुरु असलेले आंदोलन व महाराष्ट्र दौरा तसेच युवकांच्या आत्महत्यांचा उल्लेख करत मराठा आरक्षण मिळविण्यासाठी सर्व खासदारांची एकी महत्वाची असल्याचे छत्रपती संभाजीराजेंच्या या पत्रातुन दिसुन येत आहे.

छत्रपती संभाजीराजेंनी पत्रात लिहिलं की, मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही वर्षांपासून संघर्ष करत आहे. यासाठी अनेक भव्य मोर्चे, आंदोलने, उपोषणे झालेली आहे. काही युवकांनी यासाठी आत्महत्या सारखा टोकाचा मार्ग निवडला. समाजाच्या भावना तीव्र आहेत. तरीही मराठा समाजाने आपली मागणी अतिशय शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने पुढे आणलेली आहे.

मराठा समाजाच्या मागणीला प्रतिसाद देवून २०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण सरकारने तर २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कायदेशीर पातळीवर हे आरक्षण टिकले नाही. मी स्वतः २००७ पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात सातत्याने जनजागृती करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवत काही आंदोलने स्वतः देखील केली आहे.

राज्यसभा सदस्य असताना सभागृहात देखील हा विषय सविस्तर पणे मांडला होता. तसेच संसद परिसरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धरणे आंदोलन ही केले होते. मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी आंदोलन करत महाराष्ट्र दौरा करत आहेत. मराठा समाजाचे लाखो युवक हे देखील आंदोलनात सहभाग घेत आहेत.

या पार्श्वभूमीवर माझी आपणास कळकळीची विनंती आहे की याबाबत आपण हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी या नात्याने आवाज उचलणे आवश्यक आहे. या विषयी लवकरच नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील सर्व लोकसभा, राज्यसभा खासदारांनी एकत्रित मराठा आरक्षण मिळवण्याबाबत ठोस भूमिका ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीचे सविस्तर निमंत्रण मी लवकरच आपणास पाठवेल. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत आणि समाजाला न्याय मिळावा हि विनंती. असे त्यांनी पत्रात लिहिलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com