'या' शहरातील उद्याने 15 दिवसांसाठी सर्वसामान्यांसाठी बंद
नाशिक : शहरातील उद्याने 15 दिवसांसाठी सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. नाशिक महापालिकेकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे. नाशिक शहरात आयफ्लूचे रुग्ण झपाट्याने वाढत असून आतापर्यंत 4 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून खबरदारी घेत शहरातील उद्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संसर्ग पसरू नये म्हणून महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
डोळे येणे या संसर्गजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डोळ्यांच्या संसर्गजन्य आजारामुळे अनेक जण त्रस्त होत आहेत. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याची आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. डोळ्यांचा आजार हा संसर्गजन्य व विषाणूजन्य आजार असल्याने डोळ्यांच्या आजाराचे लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाण्याचा सल्लाही दिला आहे.
डोळ्यांच्या आजाराची लक्षणे
- डोळ्यात टोचल्यासारखे व खुपसल्यासारखे वाटणे
- डोळे लाल व गुलाबी होणे
- डोळ्यांना खाज व जळजळ होणे
- झोपेतून उठताना पापण्या एकमेकांना चिटकून बसणे
- पापण्यांना सूज येणे
- डोळ्यातून सतत पाणी येणे
डोळे आल्यास काय काळजी घ्याल?
- लक्षणे दिसताच सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे
- स्वतःच्या वस्तू उदाहरणार्थ टॉवेल, रुमाल, उशी, चादर दुसऱ्यास वापरायला देऊ नये
- घरच्या किंवा बाहेरच्या व्यक्तींच्या संपर्कात थेट येणे टाळावे
- वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावे
- डोळ्यांना व चेहऱ्याला सतत स्पर्श करणे टाळावे
- प्रोटेक्टिव्ह गॉगल किंवा काळा चष्मा वापरावा
स्वतःहून काही उपचार न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध उपचार करावा
डोळ्यांचा आजार हा सौम्य स्वरूपाचा आजार असून साधारण चार ते पाच दिवसांपर्यंत राहतो. मात्र सौम्य स्वरूपाचा जरी असला तरी नागरिकांनी याकडे दुर्लक्ष न करता योग्य निगा व वेळीच औषधोपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो.