CM Devendra Fadnavis : "लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेसला..." फडणवीसांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल, काय लिहिलं लेखात जाणून घ्या..

आणीबाणीला 50 वर्षे: फडणवीसांचा काँग्रेसवर हल्ला, लोकशाहीच्या महत्त्वावर भाष्य.
Published by :
Riddhi Vanne

इंदिरा गांधी यांच्या काळात लागलेल्या आणिबाणीला आता 50 वर्ष पुर्ण झाली आहेत. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका विशिष्ट वृत्तपत्रात लेख लिहून कॉंग्रेसवर जहरी टीका केली. लोकशाही आणि गांधी घराण्यावर हल्ला चढवला आहे. आणीबाणीमुळे देशात हुकूमशाही निर्माण झाली असती, असा इशाराही दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांनी, लेखात काय म्हटलं?

25 जून 1975. देशातील एका काळ्याकुट्ट अध्यायाला आज 50 वर्षे झाली. त्याला सुवर्ण महोत्सव म्हणायचं तरी कसं? महोत्सव हा चांगल्याचा करायचा असतो. संविधान, संविधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेसने लिहिलेल्या या अध्यायाला 50 वर्ष झाली. आणीबाणीने अनेक कुटुंबाना उद्धवस्त केलं. अनेकांनी आपले आप्तस्वकीय घरातील कमावती व्यक्ती कारागृहात असताना अनेक कुटुंबं कर्जबाजारी झाली. मानसिक, आर्थिक पातळीवर मोठं शोषण झालं.

पुढे देवेंद्र फडणवीस लिहितात की, मी केवळ 5 वर्षांचा होतो माझे वडील दि. गंगाधरराव फडणवीस यांनाही अटक झाली होती. कारागृहात डबा द्यायला जाताना किंवा त्यांना वैद्यकीय तपासणीला नेण्यासाठी फक्त भेट होत असे, लहान वयात वडिलांपासून बराच काळ दूर राहावं लागलं, त्यामुळे मनातून चिड होती. आणीबाणीनंतर विधिपालिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका या व्यवस्थांचं महत्त्व अधिक अधोरेखित झालं होतं. लोकशाहीचं महत्त्व काय, हे अधिक प्रकर्षाने लोकांना समजलं. संविधानावरील श्रद्धा अधिक दृढ झाली. त्या नेत्यांनी संघर्ष केला नसता, तर कदाचित आपल्या देशातही हुकुमशाही प्रस्थापित झाली असती. आज जी अवस्था पाकिस्तानची आहे, तीच भारताचीही झाली असती. आज जी लोकशाही जिवंत आहे, ती 50 वर्षांपुर्वी संघर्ष केलेल्या नेत्यांमुळे आहे. गांधी घराणे आणि काँग्रेसने केलेल्या शोषणाच्या कथा जितक्या प्रकर्षाने पुढे येतील, त्यातून लोकशाही अधिक भक्कम होत जाईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com