Anil Ambani : अनिल अंबानींच्या अडचणीत मोठी वाढ; ईडीने पाठवले समन्स
(Anil Ambani) उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनिल अंबानी यांना प्रवर्तन संचालनालय (ED) ने 5 ऑगस्ट 2025 रोजी चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. हे समन्स तब्बल 3,000 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बजावण्यात आले आहे. येस बँकेमार्फत विविध कंपन्यांना दिले गेलेले संशयित कर्ज, त्याचा वापर, आणि अनधिकृत आर्थिक व्यवहारांची चौकशी सध्या सुरू आहे.
या संदर्भात रिलायन्स समूहाशी संबंधित कंपन्यांच्या देशभरातील 35 पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईत आर्थिक कागदपत्रे, संगणकीय डेटा आणि व्यवहारांची महत्त्वपूर्ण माहिती हस्तगत करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात काही कंपन्यांना विनाअडथळा मोठ्या रकमेचे कर्ज देण्यात आले, ज्यात नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय आहे. या कंपन्यांनी नंतर हे पैसे विविध शेल कंपन्यांच्या माध्यमातून इतरत्र वळते केल्याचा आरोपही ईडीने तपासादरम्यान नोंदवला आहे.
CBI ने याआधीच याच प्रकरणात प्राथमिक माहिती अहवाल (FIR) नोंदवले आहेत. त्यानंतर ईडीने आर्थिक गैरव्यवहाराच्या दिशेने स्वतःची स्वतंत्र चौकशी सुरू केली होती. काही व्यवहारांमध्ये येस बँकेचे माजी वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित व्यावसायिकांमध्ये 'कर्ज मंजुरीपूर्वी आर्थिक लाभांचे व्यवहार' झाल्याचेही प्राथमिक निष्कर्षात नमूद आहे.