Bacchu Kadu Farmers Protest : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर बच्चू कडू ठाम; आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत होणार चर्चा
थोडक्यात
बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांवर करणार चर्चा
मुंबईत चर्चा होईपर्यंत आंदोलन सुरू राहिल
( Bacchu Kadu Farmers Protest ) कर्जमाफी, सातबारा कोरा आणि शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या महाएल्गार आंदोलनामुळे नागपूरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्याकडून ट्रॅक्टरसह लाँग मार्च काढण्यात आला आहे.
चक्का जाम करण्यात आला. शेतकऱ्यांनी संपूर्ण संसार रस्त्यावर मांडल्याचे पाहायला मिळाले. बच्चू कडू आंदोलनावर ठाम असून जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत हटणार नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर बच्चू कडू ठाम असल्याचे पाहायला मिळत असून बच्चू कडू आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांवर ते चर्चा करणार असून मुंबईत चर्चा होईपर्यंत आंदोलन सुरू राहील असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता वाहतून सुरळीत झाली असून जवळपास 30 तासांपासून वाहतूक कोंडी सहन करणाऱ्या नागपूरकरांना सध्या दिलासा मिळाला आहे. बच्चू कडू चर्चा करणार असल्यामुळे आंदोलकांनी महामार्ग मोकळा केला.
मात्र आता केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या बाजूच्या नियोजित मैदानावर आंदोलन केले जाणार, त्यामुळे आजच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील चर्चेत काय तोडगा निघतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
