दुर्घटनाग्रस्त गोविंदांना शासनाकडून आर्थिक सहाय्य, पण १८ वर्षांखालील गोविंदांना मदत नाही

दुर्घटनाग्रस्त गोविंदांना शासनाकडून आर्थिक सहाय्य, पण १८ वर्षांखालील गोविंदांना मदत नाही

शिंदे सरकारने गुरुवारी विधानसभेत दहीहंडीसंबंधीत मोठ्या घोषणा केल्या. यामुळे गोविंदा पथकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मुंबई : शिंदे सरकारने गुरुवारी विधानसभेत दहीहंडीसंबंधित मोठ्या घोषणा केल्या. यामुळे गोविंदा पथकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रो कबड्डी प्रमाणे राज्यात प्रो दहीहंडी स्पर्धाही सुरू केल्या जाणार आहेत. तर, आर्थिक सहाय्याची योजनेची घोषणाही करण्यात आली आहे. परंतु, यामध्ये अटीही लागू होणार आहे.

दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदा व त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. यानुसार गोविंदा पथकातील खेळाडूचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल.

दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल. हा आदेश केवळ या वर्षीसाठी म्हणजेच वर्ष 2022 पर्यंत लागू राहणार आहे. परंतु, यासोबत शासनाने अटी-शर्तीही घातल्या आहेत. पण, याबाबत अनेक गोविंदांना माहिती नाही.

काय आहेत अटी-शर्ती?

- दहीहंडीसाठी स्थानिक आवश्यक परवानग्या असणे गरजेचे आहे. न्यायालय, प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे आयोजक संस्था तसेच गोविंदा पथकांनी पालन करणे आवश्यक आहे.

- गोविंदांच्या सुरक्षेची सर्व काळजी संस्थांनी घेतलेली असावी, त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी औपचारिक किंवा अनौपचारिक प्रशिक्षण घेतलेले असावे.

- मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास सदर आर्थिक सहाय्य पात्र राहणार नाही.

- गोविंदांबाबतीत वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असून 18 वर्षाखालील सहभागी गोविंदा आर्थिक सहाय्यास पात्र राहणार नाहीत.

- मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास गोविंदांना तत्काळ वैद्यकीय मदतीची कार्यवाही आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने करणे गरजेचे आहे. मनोरे रचताना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणेकडे अहवाल देणे आवश्यक आहे.

दरम्यान, दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात विम्याचा प्रीमियम भरण्याची योजना शासन तपासत असून दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com