Nagpur Marbat : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी आणि पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार
(Nagpur Marbat) नागपूरच्या परंपरेचा वेध घेणारा आणि शहराच्या संस्कृतीत आपलं वेगळं स्थान निर्माण करणारा मारबत उत्सव यंदा 145 वर्षे पूर्ण करत आहे. हा उत्सव केवळ धार्मिक विधींशी जोडलेला नसून सामाजिक जाणीव, श्रद्धा आणि लोकसहभाग यांचं सुंदर मिश्रण आहे.
शहरात सध्या काळी आणि पिवळी मारबत ठेवण्यात आली आहे. त्यांचं दर्शन घेण्यासाठी नागपूरसह राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. यामुळे शहरभर उत्साहाचा वातावरण आहे.
मारबत उत्सवाचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील वाईट प्रवृत्ती, अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथांचा निषेध करणे. बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबतींसह विविध बडगे मिरवणुकीत सहभागी होतात. अखेरीस या प्रतिकात्मक मूर्तींचं दहन करून लोक चांगल्या विचारांचं स्वागत करतात.
पिवळी मारबत ही देवीचं रूप मानली जाते. 1885 साली तेली समाज बांधवांनी या परंपरेची सुरुवात केली. तेव्हापासून दरवर्षी पिवळ्या मारबतीची भव्य मिरवणूक काढली जाते. महिलांचा आणि लहान मुलांचा मोठा सहभाग हा या सोहळ्याचा खास पैलू मानला जातो. काळी मारबत मात्र वेगळी कहाणी सांगते. सुमारे 144 वर्षांपूर्वी इंग्रजांशी हातमिळवणी करणाऱ्यांविरोधात तिची सुरुवात झाली. कृष्णवधासाठी आलेल्या पुतना मावशीचे प्रतीक म्हणूनही तिला ओळखलं जातं. नागपूरमध्ये ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी केली जाते.
आजच्या काळात मारबत उत्सव केवळ श्रद्धेचा विषय राहिलेला नाही तर समाजजागृतीचं प्रभावी माध्यम ठरला आहे. नागपूरकरांसाठी तो अभिमानाचा ठेवा असून, या परंपरेतून मिळणारे संदेश आजही तितकेच महत्त्वाचे वाटतात. ही मिरवणूक केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाची नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक देखील मानली जाते