Devendra Fadnavis : '2029पर्यंत मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री'; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
थोडक्यात
मुख्यमंत्री फडणवीस मुंबईतील 'वर्षा' निवासस्थानी संवाद साधला
2029पर्यंत मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
सत्ताधारी आघाडीत कोणताही बदल होणार नाही
(Devendra Fadnavis) मुख्यमंत्री फडणवीस मुंबईतील 'वर्षा' निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2029 पर्यंत तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील आणि सत्ताधारी महायुतीत कोणताही फेरबदल होणार नाही. फडणवीस म्हणाले की, "भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युतीत समावेश कायम राहणार असून, नवीन भागीदार येणार नाहीत आणि विद्यमान भागीदारांमध्ये अदलाबदलही होणार नाही."
विरोधकांकडून मतदार यादीवर करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी सांगितले की, "विरोधकांकडे कोणतेही ठोस पुरावे किंवा सूचना नाहीत. त्यांचा हेतू केवळ निवडणुका विलंबित करण्याचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी होतील," असे त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, “राज ठाकरे यांनी ‘मी दोन भावांना जवळ आणले’ असे म्हणत केलेले विधान हे मी कौतुकाच्या दृष्टीने घेतो. ठाकरे बंधू मतदानानंतर एकत्र राहतील, अशी माझी आशा आहे.”
यासोबतच ते पुढे म्हणाले की, "स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सत्ताधारी आघाडी योग्य समन्वय साधेल. मुंबई महानगर प्रदेशात निवडणुकीपूर्वी आघाडी ठरेल, तर इतर भागांमध्ये निवडणुकीनंतर समन्वय केला जाईल." असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
