वनमंत्र्यांच्या मतदार संघात अवैध वृक्षतोड; महामार्गावरील झाडाची सर्रास कत्तल
अनिल ठाकरे | चंद्रपूर : बस स्थानक समोरील क्र. ९३० बल्लारपूर-हैद्राबाद महामार्गावरील अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या एका झाडाची खुलेआम कत्तल करण्यात आली. हा पराक्रम शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाने केला असून या पराक्रमात नगर रचनाकार अक्षय राऊत यांची मुकसंमती असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत नगर परिषदेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना नाही. त्यामुळे वनसंपत्तीवर निष्णात प्रेम करणारे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याच विधानसभा क्षेत्रात घडलेली दुर्दैवी घटना अवघ्या महाराष्ट्राला लाजिरवाणी ठरली आहे. आता खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यावर काय भूमिका घेतात, याकडे पर्यावरण प्रेमी आणि अवघ्या शहरवासियांच्या नजरा लागल्या आहेत.
बस स्थानकासमोरील क्र. ९३० बल्लारपूर-हैद्राबाद महामार्गालगत चीचवा या प्रजातीचे वृक्ष आहे. परिसर नेहमी गजबजलेला असतो. आसपास इतर कोठेही झाड नसल्यामुळे उन्हाळ्यात याच वृक्षाच्या सावलीचा आसरा प्रवाशी घेतात. मात्र, व्यवसायिक दृष्टिकोन समोर ठेऊन व्यवसायिक चंदू आसवांनी यांनी रितसर परवानगी न घेता ४० वर्ष जुन्या झाडावर दुपारच्या सुमारास झाडाची कत्तल करण्याचा पराक्रम केला. अवघ्या आठवडाभरापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा फलक हटवून वाद निर्माण केला. महाशय यात सुखरूप सुटले. मात्र, शेकडो शिवभक्तांवर विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
शासकीय नियमानुसार महामार्गावरील कुठलेही झाड तोडताना नगर परिषद, वन विभाग यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. शिवाय परवानगी घेतल्यानंतरही झाड तोडताना वाटेकरुला कुठलीही इजा होऊ नये, याकरिता सुरक्षिततेच्या नियमावलीचेही पालन करणे नित्याचे आहे. परंतु, सर्व शासकीय नियम पायदळी तुडवत नगर रचनाकार अक्षय राऊत यांच्याशी आपसी देवाणघेवाण करून मुक संमती मिळवून या झाडाची कत्तल करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांकडून केला जात आहे. ५० कोटी वृक्ष लागवड करून संपूर्ण जगाला पर्यावरणाचे महत्व सांगणाऱ्या खुद्द वनमंत्र्यांच्या विधानसभा क्षेत्रात असा प्रकार घडल्याने आता सुधीर मुनगंटीवार यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.