Laxman Hake
Laxman Hake

Laxman Hake : 'संभाजी ब्रिगेडने जे पेरले तेच उगवले'; प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यावर हाकेंची प्रतिक्रिया

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्यात आली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Laxman Hake ) संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्यात आली. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया दिली आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले की, 'संभाजी ब्रिगेड ने जे पेरले तेच उगवले. संभाजी ब्रिगडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी प्रथम निषेध व्यक्त करतो. कोणतीही मागणी, मांडणी, वैचारिक लढाई संविधानाच्या चौकटीत झाली पाहिजे. या मताचा मी आहे मात्र ही चौकट मोडून रस्त्यावर दहशत माजवण्याच्या अनेक घटना संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून घडल्या आहेत. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेची तोडफोड, वाघ्याचे स्मारक उखडून दरीत फेकणे, गडकरींचा पुतळा उध्वस्त करणे, शाईफेक करणे, फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या समाजिक चळवळी बदनाम करणे, उपेक्षितांच्या लढा लढणाऱ्यांच्या गाड्या फोडणे, अशा शेकडो घटना आहेत.'

'ब्रिगेडने हिंसाचाराचं सामान्यीकरण केलं. हिंसाचार माजवणाऱ्यांचे खुले सत्कार केले, बक्षिसं जाहीर केली. आता ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांवर ही वेळ आली. उपेक्षित आणि विस्थापितांच्या विकासनवाटेवर बाभळ पेरण्याचं काम ब्रिगेडनं केलं. तेच काटे ब्रिगेडच्या वाट्याला आलेत. पेरलं ते उगवलं यालाच म्हणतात. संभाजी ब्रिगडने पुरोगामीत्त्वाची झुल ओढून, जातवर्चस्वाची भावना निर्माण करण्याचे काम केले. यासाठी ब्राम्हण ना शिव्या घालणे आणि बहुजन बहुजन म्हणून डांगोरा पिटणे, महाराष्ट्राच्या गावागाड्यात कधी माळी तर कधी धनगर तर कधी वंजारी समाजाला गेली २ दशकं टार्गेट केलं जातंय, बलुते अलुते तर लोकशाहीच्या कोणत्या घरात राहतात हे अजून कळलेले नाही.'

'गावागाड्यात आत्ता ब्राह्मण उरला नाही तर टार्गेट कुणाला करायचं,गुरवाची दिवा बत्ती ची वतनी जमीन, रामोशी वतन, माझ्या दलित बांधवांच्या गावाकूसा बाहेरच्या जमिनी गावोगावी कुणी लाटल्या, प्रवीण गायकवाड नेहमी समता मुलक समाज म्हणतात मग जरांगे ओबीसी आरक्षण उध्वस्त करायला निघाले त्यावर ते काहीच बोलत नाहीत. बलुतेअलुते, भटक्याविमुक्त जातीजमाती मध्ये मराठा सामील झाला तर कसा समता मुलक समाज निर्माण होईल ? जरांगेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आयाबहिणीवरून शिव्या दिल्या त्याच्याबद्दल ब्र शब्द संभाजी ब्रिगेडने कधी काढला नाही. उलट जरांगेंविरोधात वास्तव मांडणाऱ्या डॉक्टराच्या अंगावर शाई फेकली.'

'बहुजन बहुजन म्हणून मराठेत्तरांचा फक्त वापर करण्यात आला. ओबीसी आरक्षणावर टाच येत असताना ओबीसीची भूमिका घेणाऱ्या लक्ष्मण हाकेवर पुण्यात एकटं गाटून हल्ला करण्यात आला तो जीवघेणा नव्हता काय? तो कोणी केला होता? ओबीसी म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या बाजूने जर संभाजी ब्रिगेड कधी उभी राहिली असती तर खऱ्या अर्थाने ती फुले, शाहु, आंबेडकरांचा वारसा जपणारी संघटना आहे. असे म्हणता आले असते. २०१६- २०१७ ला अॅट्रोसिटी रद्द करण्याचे मोर्चे जेव्हा निघाले तेव्हा ब्रिगेडचा खुला पाठिंबा या मोर्चांना होता. धनगर किर्तनकाराला मारहाण झाली, दलितांना गावातून बहिष्कृत करण्यात येतं. तेव्हा ब्रिगेड तिथं पोहचून जातआंधळ्या बंधुभावकीची समजूत काढताना कधी दिसली का? रयत शिक्षण संस्थेवर दलित, ओबीसी, मायक्रो ओबीसींचे प्राध्यपक आरक्षणा प्रमाणे असावेत म्हणून कधी आवाज उठवल्याचं पाहिलं का? या प्रश्नाची उत्तरं शोधल्यास ब्रिगेडचं खरं रुप आपणास उमजेल. बहुजन बहुजन म्हणायचं आणि सरदार वतनदार यांना सत्तेत बसवण्यासाठी कुटील डाव खेळायचे काम ब्रिगेड ने केले आहे. आत्ता म्हणे शेवटाची सुरुवात ती कशी असते बरं आलटून पालटून नेहमी सत्तेत बसणे ही आहे का शेवटाची सुरुवात?' असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com