येत्या अधिवेशनात फ्लोर टेस्ट झाली तर 164 वरून 184 मतदान होईल; बावनकुळेंचा दावा
मुंबई : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल करताना निवडणुका लावण्याची हिंमत दाखवत नसल्याचा टोला लगावला होता. तसेच, हे सरकार अल्पावधीत कोसळणारच, असा पुनरुच्चार पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी केला होता. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अनेक वेळा म्हटलं जातंय कि हे सरकार पडणार आहे. पण, स्वप्नात देखील त्यांनी हे पाहू नये. जर येत्या अधिवेशनात फ्लोर टेस्ट घेतली. तर आमचे 164 वरून 184 मतदान होईल. शिवसेनेकडे फक्त 4 लोक दिसतील. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी आमची काळजी करू नये, त्यांचे लोक सोडून जातील म्हणून त्यांचे आरोप सुरु आहेत, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
मुंबईत गेल्या अडीच वर्षात डेव्हलपमेंट झाली नाही. मात्र, पंतप्रधान मोदी आता मुंबईत आल्यावर मुंबईकरांना मोठं गिफ्ट देतील. मोदी येणार त्याची जोरदार तयारी सध्या सुरु आहे याची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर आहे. मोदी येतात हे खूप आहे त्यांना ऐकायला लोकांना बोलवण्याची गरज नाही ते स्वतः येतात, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच, ज्यांनी कोणतंही घोटाळा केला नसेल त्यांनी घाबरायची गरज नाही त्यांनी तपासाला सामोरे जावे, असेही त्यांनी म्हंटले आहे.