अमरावतीमधील हिंसक घटनांवर सरकारने कडक कारवाई करावी- देवेंद्र फडणवीस
अमरावतीमधील बंदला लागलेल्या हिंसक वळणामुळे तवावपुर्ण स्थिती निर्माण झाली आहे. आज अमरावतीत मोर्चामध्ये दगडफेक आणि तोडफोड झाल्यानंतर हा मोर्चा हिंसक वळणावर गेला आहे. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून मोर्चाला नियंत्रणात आणावं लागलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटने विषयी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्रिपुरामध्ये अशी कोणती घटनाच घडली नसल्याचं सांगितलं. त्रिपुरामध्ये मशीद जाळण्यात आल्याच्या प्रकरणाचा निषेध म्हणून हे मोर्चे काढले जात असल्याचं सांगितलं जात आहे. तर "अमरावतीमधील एकूणच घटनाक्रम अस्वस्थ करणारा आहे. पहिल्यांदा सर्वांना विनंती करतो की अमरावतीत शांतता प्रस्थापित करावी. कुणीही हिंसाचार करू नये. पण ज्या प्रकारचे मोर्चे महाराष्ट्रात निघाले, हे एक सुनियोजित षडयंत्र वाटतंय.
त्रिपुरामध्ये जी घटनाच घडली नाही, त्या घटनेवर अशा प्रकारचे मोर्चे काढणं अत्यंत चुकीचं आहे. तसेच तर या दंगलींची जबाबदारी सरकारवर येणार आहे. त्यामुळे कुणीही महाराष्ट्रात दंगल करू नये आणि अशा प्रकारे मोर्चे काढून विनाकारण हिंदूंची दुकानं टार्गेट करणं हे देखील बंद झालं पाहिजे आणि दोन्ही समाजांनी शांतता पाळली पाहिजे. सरकारने यावर कडक कारवाई केली पाहिजे " अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.