भाजप विरोधात बोलणाऱ्यांवर चुकीची कारवाई, शरद पवारांचा भाजपवर घणाघात
Sharad Pawar : राज्यात अभूतपूर्व राजकीय गोंधळ घडल्यानंतर आता राज्यात शिंदे-फडणवीस यांचे नवे सरकार अस्तित्वात आले आहे. मात्र, या सरकारने आल्यापासून महाविकास आघाडीच्या काळातील अनेक निर्णय रद्द करून पुन्हा नव्याने मंजुर करण्यात आले. या निर्णय बदलामुळे महाविकास आघाडी नेते नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. देशात अनेक राज्यात भाजप अशाप्रकारे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असते. (Misuse of power Sharad Pawar attacked On BJP)
दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. जिथं नव्हती तिथं आणली गेली. महाराष्ट्रातही भाजपची हुकुमत नव्हती, पण शिवसेनेचे आमदार गेल्यानं भाजपची हुकुमत आल्याची खोचक टीका पवार यांनी केलीय. सोबतच माजी गृहमंत्री अनिल देशमुख माजी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईवरही पवार यांनी संताप व्यक्त केला.
देशात सत्तेचा गैरवापर
शरद पवार हे आज दिल्ली दौऱ्यावर असतांना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावर महाराष्ट्रातील राजकारणा संदर्भात प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक झाली. ते विरोधात लिहित होते, म्हणून त्यांच्यावर कारवाई केली. अशा पद्धतीने आज देशात कारवाया केल्या जात आहेत. देशात सत्तेचा गैरवापर केला जातोय. आज हुकुमत त्यांच्या हातात आहे. जो राजकीय पक्ष किंवा नेता त्यांच्याविरोधात बोलतो त्याच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जाते. अनिल देशमुख गृहमंत्री होते, त्यांना अटक केली. त्यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केली. त्यांच्यावर 100 कोटींचा आरोप करण्यात आला. शिक्षणासाठी 100 कोटी घेतले तरी त्यांच्यावर चार्जशीट दाखल केली. नंतर ती रक्कम 4 कोटी झाली, नंतर 1 कोटी झाली, असे बोलत शरद पवारांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्ला चढवला.
देशातील लोकांमध्ये संभ्रम
सध्या केंद्र सरकारकडून विरोधीपक्षावर दडपण आणण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर केला जात आहे. भाजप सध्या ईडी, सीबीआयला सोबत घेऊन सध्या काम करत आहे. आज देशातील लोकांमध्ये संभ्रम आहे. भाजप आणि त्यांच्या नेत्यांजवळ आज बहुमत आहे. पण हे उचित बहुमत नाही. देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. तिथं नव्हती तिथं आणली गेली. महाराष्ट्रात भाजपची हुकुमत नव्हती. मात्र शिवसेनेचे आमदार गेल्याने महाराष्ट्रात भाजपची हुकुमत आली, अशी खोचक टिका शरद पवार यांनी भाजपवर केली.