मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यात भरती सुरू असताना देशातील भावी सैनिकांचे भरतीसाठी आले असता अतोनात हाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोटी सरकारवर सामना संपादकीयमधून टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रभक्तीचा असा व्यापार म्हणजे बेशरमपणाचा कळस आहे, अशा शब्दात शिवसेनेने मोदी सरकारवर टीका केली आहे.
प्रत्यक्षात अग्निवीरांची अवस्था भिकाऱ्याहून भिकाऱ्यासारखी केल्याचे महाराष्ट्रात पाहायला मिळाले. विकसित हिंदुस्थानसाठी हेच पंचप्राण असतील तर कसे व्हायचे? बेरोजगार तरुणांची सैन्यभरतीच्या नावाखाली अशी थट्टा जगाच्या पाठीवर कोठेच झाली नसेल. मुळात बेरोजगारांना गुलाम व लाचार बनविण्यासाठी ‘अग्निवीर’ ही योजना आहे व महाराष्ट्रात याचे बिंग फुटले. झुंडीच्या झुंडी गोळा करून त्यांना भ्रमित करायचे, धर्माची अफू त्यांच्या डोक्यात कोंबायची व त्याच नशेत ठेवून निवडणुका जिंकायच्या हेच ज्यांचे ‘पंचप्राण’ आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करायची, असा टोला शिवसेनेने मोदी सरकारला लगावला आहे.
एकीकडे अग्निवीर अग्निवीर म्हणून बेरोजगार तरुणांना राष्ट्रसेवक वगैरे म्हणायचे आणि दुसरीकडे ते भरतीसाठी आले की, त्यांचा अपमान करायचा. उपाशी-तापाशी लोकांना ‘वंदे मातरम्’चे नारे द्यायला लावायचे. हे धंदे बंद करा. बेकायदेशीर, घटनाद्रोही कृत्यांची लाज बाळगा. जिथे तिरंगा फडकवायचा तिथे हातभर शेपटा घालून आपल्या मोहल्ल्यांत तिरंगा यात्रा काढायच्या हे ढोंग आहे. राष्ट्रभक्तीचा असा व्यापार म्हणजे बेशरमपणाचा कळस आहे, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात भरती सुरू असताना देशातील भावी सैनिकांचे भरतीसाठी आले असता अतोनात हाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून,या युवकांना राहायला जागा नाही,खायला अन्न नाही,आणि पावसात झोपायची वाईट वेळ निर्माण झाली असून पावसाने काही विद्यार्थ्याचे महत्वाचे कागदपत्रे खराब झाली आहेत.भावी अग्निविर हा अश्या अडचणींना तोंड देत असून याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी करत आहे.