Uddhav Thackeray: 'मला अर्धवटराव म्हणत असतील तर ते...' फडणवीसाच्या टीकेनंतर ठाकरेंचे जोरदार प्रत्युत्तर
मुंबई: सोमवारी शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडल्यानंतर आज शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक बोलवली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केले. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने नगरसेवकांना त्यांनी कानमंत्रही दिल्याची चर्चा आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत येत्या एक जुलैला मुंबई महापालिकेवर भव्य मोर्चा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सोबतच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला सुद्धा प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'काल शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा झाला. त्याआधी शिबीर झालं. आज बऱ्याच दिवसानंतर नगरसेवकांची बैठक घेतली. पावसासारख्याच निवडणुका सुद्धा लांबणीवर जाताय. लोकांची काम करायची कशी? असा प्रश्न पडतो आहे. मुंबईकरांचा पैसा उधळला जातोय, वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. त्यावर कुणाचं नियंत्रण नाही. मुंबईला मायबाप कोणी राहिला नाही. या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी, या भ्रष्टाचाराविरोधात मुंबई महापालिकेवर 1 जुलैला आम्ही मोर्चा काढू. आदित्य ठाकरे या मोर्च्याचं नेतृत्व करतील.' अशी माहिती त्यांनी दिली.
अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो, ते पूर्ण ऐकलेच नाही. असो, आता ऐका याच अर्धवटपणामुळे तुम्हाला पानिपत शब्द अलिकडे अधिक आठवायला लागला. म्हणून म्हणतो स्क्रिप्ट रायटर बदला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. या टीकेला उत्तर देतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला अर्धवटराव म्हणत असतील तर देवेंद्र फडणवीस काय आवडाबाई आहेत का?, पण सध्या देवेंद्र फडणवीस हे ना-आवडाबाई झाले आहेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला.