कळवा येथील मदरसामध्ये शिक्षकांकडून मारहाण; पाच मुले पळाली
अमझद खान | कल्याण : मदरसामध्ये शिक्षण घेणाऱ्या पाच अल्पवयीन मुले दररोजच्या मारहाणीला कंटाळून आपल्या गावी बिहार येथे जाण्यासाठी निघाले. मात्र, एका दक्ष महिला प्रवाशाने याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली असता पाचही मुलांना ताब्यात घेत चौकशी केली. व त्यांची रवानगी उल्हासनगर येथील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. डोंबिवली जीआरपीने या घटनेसंबधित मदरसा मधील दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला असून प्रकरण कळवा पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे.
एका ट्रेनमध्ये १ ऑगस्ट रोजी पाच अल्पवयीन मुलं बसली होती. ही मुलं बिहार येथे आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती. यावेळी लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेने या मुलांची चर्चा ऐकली. व त्यांच्या चर्चेवरून मुलांसोबत काहीतरी गैरप्रकार झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. महिलेने तात्काळ रेल्वे कंट्रोलला फोन करत याबाबत माहिती दिली. डोंबिवली जीआरपीने या पाचही मुलांना तात्काळ ताब्यात घेतले. पोलिसांनी विचारपूस केली असता ही सर्व मुलं बिहार येथील असून त्यांना पुन्हा मुळ गावी जाण्यासाठी निघाले होते. मुलांच्या कुटुंबाने त्यांना शिक्षण घेण्यासाठी कळवा येथील मदरसात पाठवलं होते. मात्र, त्या मदरसामध्ये त्यांना मारहाण करण्यात येत होती. त्यामुळे या मुलांनी तेथून पळ काढला, असे मुलांनी सांगितले.
पोलिसांनी या मुलांना चाईल्ड वेल्फेर कमिटीसमोर स्वाधीन केले. या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात भादंवि ३२४ व बाल हक्क कायदा ७५ अंतर्गत संबधित मदरसाच्या दोन शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हा कळवा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे डोंबिवली रेल्वे पोलिसांनी सांगितले.

