Maharashtra Assembly Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस; विरोधक विविध मुद्द्यांवरून आक्रमक होण्याची शक्यता
(Maharashtra Assembly Monsoon Session) कालपासून राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. हे अधिवेशन 30 जूनपासून18 जुलैपर्यंत असणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
विधिमंडळ अधिवेशनात विरोधक अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी पक्षाला घेराव घालण्याची तयारीत आहेत. हिंदी भाषा सक्तीवरून घेतलेला युटर्न, शक्तिपीठ महामार्ग, शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन, लाडकी बहीण तसेच विकासकामे यावरून विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता असून उघडकीस आलेले भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांबाबत केलेले वक्तव्य याचा विरोधक समाचार घेणार आहेत.
त्याचसोबत 57 हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत. यावरती ही चर्चा होणार आहे. यासोबतच पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, पुण्यात तळेगावजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून पर्यटकांचा झालेला मृत्यू, अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा सुरू असलेला गोंधळ, शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तिपीठ महामार्गाला दिलेली चालना, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारने केलेले घुमजाव, अंदाज समितीच्या धुळे दौऱ्यात सापडलेले कोट्यवधी रुपयांचे घबाड या अशा मुद्द्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विविध मुद्यांवरुन पावसाळी अधिवेशन चांगलेच तापण्याची शक्यता आहे.