फडणवीस सरकारचा 100 दिवसांचा निकाल, कोणता विभाग नंबर वन?
राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषदतर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार आदिती तटकरे यांचा महिला व बाल विकास विभाग आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम दुसऱ्या तर कृषी विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. ग्रामविकासचा चौथा, तर परिवहन व बंदर विभागाचा पाचव्या क्रमांकावर आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी 100 दिवसांच्या कामाबद्दल भाष्य केले आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले कि, "राज्यात नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली. गेल्या 100 दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या 902 धोरणात्मक उद्दिष्टांपैकी 706 उद्दिष्टे (78%) पूर्णतः साध्य केली आहेत तर उर्वरित 196 उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील".
"एकूण 48 विभागांपैकी 12 विभागांनी आपली 100% उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी 18 विभागांनी 80% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत. सविस्तर माहिती तुम्हाला http://maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. या परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी, यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो".