Manoj Jarange Patil : वाशीपासून मुंबईपर्यंत चालत जाणार आणि आमरण उपोषण करणार
आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मराठा बांधवांसह मुंबईकडे निघाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी संवाद साधला. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपल्याला आता मुंबईला जायचं आहे. आपल्याला शिस्त मोडायची नाही. काट्यावर उभं राहायची वेळ आली तरी उभं राहायचं. आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. वाशीपासून मुंबई पर्यंत चालत जाणार आणि आमरण उपोषण करणार. आम्ही मुंबईला शांततेत जाणार, शांततेत बसणार आणि आरक्षण घेणार. आम्ही कोणतीही गडबड करणार नाही मी सरकारला शब्द देतो.
मी समाजाचा शब्द मोडत नाही. आजपासून मोर्चात गर्दी वाढायला सुरुवात होणार. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही. आता उद्यापासून आपण सगळे स्वयंसेवक. आपल्या मोर्चामुळे कुणाला त्रास होता कामा नये. एवढी गर्दी मी कधी आयुष्यात बघितली नव्हती. 26 तारखेला मुंबईत मराठ्यांची संख्या वाढणार. आता फक्त वाशीचा मुक्काम बाकी. रॅलीत कोण गडबड करणार असेल तर लक्ष ठेवा. जे गोंधळ घालतात त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या.
मुंबईत एका जागेवर बसून आंदोलन करायचे आहे. मराठा आरक्षण अखेरच्या टप्प्यात. दडपण आणायचा प्रयत्न झाला तर उत्तर देऊ नका. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे. मराठ्यांच्या विरोधात जायची धमकच राहिली नाही पाहिजे. मुंबईत शांततेत आरक्षण घेतलं हा इतिहास घडावा. शेवटच्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही.