Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाचा कहर; 11 जणांचा बळी, जनजीवन विस्कळीत, पिकांचे प्रचंड नुकसान
(Marathwada Rain Update) मराठवाड्यात गेल्या पाच दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 11 जणांना जीव गमवावा लागला असून शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 498 जनावरे दगावली, तर 601 घरं व गोठे कोसळले आहेत. या पावसाळी आपत्तीचा सर्वाधिक फटका शेतीला बसला असून तब्बल 4 लाख 38 हजार शेतकरी बाधित झाले आहेत. प्राथमिक आकडेवारीनुसार, जवळपास 3 लाख 58 हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.
कापूस, सोयाबीन, तूर यांसारख्या मुख्य हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. काही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. या सर्व घटनेची प्रशासनाने मृतांच्या आणि नुकसानीची आकडेवारी जाहीर केली आहे.