इंजिनीअरिंगसाठी 12वी ला गणित, फिजिक्स सक्ती हटवली
आता आपल्याला इंजिनिअर म्हणून करियर करायचं असेल तर बारावीला गणित, फिजिक्स, केमिस्ट्री (PCM) हे विषय नसले तरी चालणार आहेत. तशा प्रकारचं नवं धोरण ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (AICTE) जाहीर केलं आहे. त्यामुळे इंजिनिअर होण्यासाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय असणं गरजेचं नाही, हे विषय आता वैकल्पिक करण्यात आले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांसमोरचा मोठा अडथळा आता दूर झाला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय गाभा समजले जातात. मात्र, 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी AICTE संस्थेने या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता संस्थेने 14 विषयांची यादी जाहीर केली असून यापैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी किमान 45 टक्के मार्कांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या या नव्या निर्णयाचे स्वागत काही घटकातून करण्यात येत असलं तरीही काही घटकातून यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन या निर्णयाने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरेल असं मत काही तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे.