Mumbai Politics: मुंबई मनपात ठाकरे बंधूंची युती ठाम! 192 मनसे तर 194 वॉर्ड ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला?
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या युतीतील जागावाटपावरून राजकीय खळबळ उडाली आहे. वॉर्ड क्रमांक १९२ मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांना देण्यात आल्याने शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, वॉर्ड १९४ शिवसेनेकडे ठेवण्यात आला असला तरी स्थानिक पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जागा परत मागण्यासाठी मातोश्रीवर धाव घेणार आहेत. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ची युतीत सामील होण्याची शक्यता वाढली असून, जागावाटपाच्या चर्चा जोरात सुरू आहेत.
ठाकरे युतीच्या अंतिम चर्चेनुसार वॉर्ड १९२ मनसेकडे तर १९४ शिवसेना (ठाकरे गट)कडे गेला. यशवंत किल्लेदार या वॉर्डातून निवडणूक लढवणार असल्याने मनसेचा हा पहिला अधिकृत उमेदवार ठरला आहे. मात्र, शिवसेनेच्या स्थानिक नेते आणि माजी नगरसेवक प्रकाश पाटणकरांसह कार्यकर्ते याला विरोध करत आहेत. दुपारी चार वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जागा आपल्याकडेच राहावी ही मागणी मांडणार आहेत. यामुळे युतीतील निर्णयावर स्थानिक पातळीवर दबाव वाढला असून, पुढील काही तासांत राजकीय हालचालींना वेग येईल.
दरम्यान, मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात महापालिका निवडणुकीतील जागावाटपावर सविस्तर चर्चा सुरू झाली आहे. सुरुवातीला ठाकरे गटाने १० जागा देण्याची तयारी दाखवली होती, पण आता ही संख्या १५ पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने मात्र प्रभाग १११ आणि ११९सह एकूण १६ जागांची मागणी केली आहे. सूत्रांनुसार, चर्चा अद्याप अपूर्ण असून, अंतिम तोडगा लवकरच निघेल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ठाकरे गटाशी चर्चा करतानाच काँग्रेससोबतही संवाद साधला आहे. यामुळे महाविकास आघाडीतील राजकीय गणित गुंतागुंतीचे झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीआधी या युतींमधून नेमका कोणता फॉर्म्युला पुढे येईल, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
