मनपा प्रशासन देणार पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोबाईल टॅब
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना अधिक बसणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्यामुळे लसीकरण पुर्ण होई पर्यंत शाळा सुरु करण्यात येणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार सातत्याने करण्यात येत आहे. त्यात मिरा भाईंदर शहरातील गरजू विद्यार्थांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिरा भाईंदर शहरात महानगरपालिकेच्या एकूण ३५ शाळा असून त्यात मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाचे विध्यार्थी शिक्षण घेत आहे. पहिली ते आठवी पर्यंतच्या विध्यार्थाची संख्या ६ हजार १७० इतकी आहे. यात पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मोबाईल फोन नसलेल्यांची संख्या ७०० आहे तर १९६७ विधार्थांकडे साधे फोन आहेत. तसेच दूरदर्शन द्वारे शिक्षण उपलब्ध केवळ २५०५ विध्यार्थांपर्यंतच पोहचू शकत आहे. आणि २१६६ विध्यार्थांकडे अँड्रॉइड फोन असल्यामुळे त्यांना झूम आणि व्हाट्सअँपद्वारे शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे.
मात्र यामुळे अनेक विध्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी येत असून शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असताना पाहायला मिळत आहे. मिरा भाईंदर शहरातील विद्यार्थांना तात्काळ टॅब उपलब्ध करून देण्याची मागणी भाजप नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी प्रशासनाजवळ केली. याकरिता महासभेत ठराव मांडण्यात आला असून टॅब विकत घेण्याकरिता प्रशासनाच्या हालचाली सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहे.