Plastic Flowers Ban : महाराष्ट्रात प्लॅस्टिक फुलांवर बंदी येणार; विधानसभेत 105 आमदारांच्या सह्यांचं पत्र सादर
(Plastic Flowers Ban ) गणपतीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गणपतीच्या सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिक फुलांवर बंदी घालण्यात येणार आहे.विधानसभेत 105 आमदारांच्या सहीसह पत्रक सादर करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचीही याला संमती असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या गणपती उत्सवाला आरास करताना नैसर्गिक फुलांचा वापर करावा लागणार आहे.
विविध सण उत्सवांच्या वेळी बऱ्याच वेळा प्लॅस्टिक फुलांचा वापर केला जातो. ही फुले जास्त वेळ टिकतात आणि नैसर्गिक फुलांच्या मानाने त्यांची किंमतही कमी असते. तसेच त्यात विविध रंग आणि नैसर्गिक छटा असल्या कारणांनी ती फुले सजावटीसाठी वापरली जातात. त्यामुळे अलीकडे प्लॅस्टिक फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र यामुळे नैसर्गिक फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नैसर्गिक फुलांची बाजारातील आवक कमी झाली.यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे प्लॅस्टिक फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध घालावे अशी मोठ्या प्रमाणावर मागणी होत होती.यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार रोहित पाटील यांनी केली. प्लॅस्टिक फुलांवर बंदी घालण्यात यावी यासाठी राज्यातील शेतकरी एकत्र झाले. तसेच सर्व आमदारांनी सुद्धा एक सहीचे पत्रक सरकारला दिले. त्या मागणीला 105 आमदारांच्या सहीसह पाठिंबा पत्र लावून आमदार रोहित पाटील यांनी ते मुख्यमंत्र्यांसमोर सादर केले.