"काँग्रेसला सत्तेत आणू नका, नाहीतर तुमच्या संपत्तीवर..." PM नरेंद्र मोदींचा जनतेला इशारा
देशाला लुटण्यासाठी पाच वर्ष पाच पंतप्रधान करण्याचा प्लॅन काँग्रेसने केला आहे. अशा लोकांना तुम्ही संधी देणार आहात का, देशाला अस्थिरतेत पाठवू शकतो का, काँग्रेसने तुम्हालाही लुटण्याचा खूप खतरनाक प्लॅन केला आहे. काँग्रेस म्हणते, ते आधी देशातील नागरिकांच्या कमाईचा एक्सरे करणार आहे. त्यानंतर तुमच्या संपत्तीवर कब्जा करणार आणि त्यानंतर त्यांच्या वोट बँकेत वाटून टाकणार. तुम्ही तुमची संपत्ती काँग्रेसला देणार आहात का? तुमच्या मेहनतीची कमाई काँग्रेसला लुटून देणार का? तुमच्या वर्तमानातील कमाईवरच काँग्रेसचा डोळा नाही, तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी जमवलेल्या संपत्तीवरही काँग्रेसचा डोळा आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. मोदी महायुतीच्या प्रचारसभेत लातूरमध्ये बोलत होते.
जनतेला संबोधीत करताना मोदी पुढे म्हणाले, काहीतरी बचत व्हावी, असं प्रत्येक माता-पित्याला वाटतं. गरिबांनाही वाटतं की, त्यांच्या मुलांसाठी काहीतरी करावं. पण काँग्रेस म्हणते, तुम्ही कमवलेली सर्व संपत्ती तुमच्या मुलांना देऊ शकत नाही. तुमच्याकडे १० एकर जमीन आहे आणि तुमच्या निधनानंतर मुलांना ही जमीन द्यायची असेल, तर तुम्हाला फक्त ५ एकर जमीन मिळणार आणि उर्वरीत ५ एकर जमीन काँग्रेस घेणार.
तुमच्याकडे दोन घरं असतील, तर तुमच्या मुलांना एकच घर देता येईल. म्हणून ते इनहॅरिटंट टॅक्स लागू करण्याचं बोलत आहे. तुमच्या मेहनतीच्या पैशांवर डाका टाकणाऱ्या या काँग्रेसच्या पंजाला कुठेही जागा मिळाली पाहिजे का, संपूर्ण देशाला माहितीय काँग्रेसच्या शाही परिवाराने मुलांसाठी कोणती संपत्ती सोडली? भरपूर पैसे, देशाच्या महत्त्वाच्या भागातील जमिनी, पॉवर आणि प्रिविलेज दिलं. काँग्रेसने सहा दशकांत देशाला फक्त गरिबी दिली.
भारत वेगानं प्रगती करत असल्याच्या बातम्या सर्व माध्यमांमध्ये येत आहेत. विकासाच्या बातम्या, भविष्याला मजबुती देणाऱ्या गोष्टी प्रत्येक दिवशी ऐकायला मिळतात. पण २०१४ च्या आधीचा काळ आठवा, तेव्हा या सर्व गोष्टी होत नव्हत्या. २०१४ च्या आधी घडलेल्या गोष्टी गुगल करा, तुम्हाला समजेल की, त्यावेळी काय घडत होतं, सर्व ठिकाणी घोषणा दिल्या जायच्या. सावधान कोणतीही लावारिस वस्तु दिसल्यावर हात लावू नका, पोलिसांना सांगा.
कारण त्याच्यात बॉम्ब असू शकतो, हात लावला तर बॉम्ब फुटू शकतो. पण मोदी आल्यानंतर कुठे गेल्या या लावारिस गोष्टी. त्यावेळी बातम्यांची हेडलाईन असायची, दिल्ली बॉम्बब्लास्ट, मुंबईत बॉम्बब्लास्ट..भारतीय पोलीस आधुनिक दशहतवादाशी लढू शकत नाही. पण आज भारत आपल्या सीमेवर वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. आज भारत पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांना घरात घुसून मारत आहे, असंही मोदी म्हणाले.