Rohit Pawar : 'कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून...' ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार काय म्हणाले?
(Rohit Pawar ) रोहित पवारांविरोधात ईडीने कारवाई केली आहे. आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून हे आरोपपत्र मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2022 अंतर्गत मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
याच्याआधी बारामती अॅग्रो कंपनीच्या 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली होती. त्यानंतर आता हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, 'कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात #ED ने कारवाई केली हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. #ED चे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं.'
'म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे. कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध दूध आणि पाणी का पाणी’ होईलच. विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे. महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलंय, हा इतिहास आहे! #सत्यमेवजयते' असे रोहित पवार म्हणाले.