“महिलांच्या बाबतीत संवेदनशील आहे असे म्हणणारे सरकार पूर्णपणे असंवेदनशील”
मुंबईमध्ये काल (११ सप्टेंबरला) साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवला गेला आहे. उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरून राज्यात चांगलीच खळबळ माजली आहे. याप्रकरणी आता साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राष्ट्रीय महिला आयोगाचं पथकं मुंबईत दाखल झालं आहे. महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.
सरकार पूर्णपणे असंवेदनशील
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून राज्य महिला आयोगाची नेमणूक करण्यात आलेली नाही. अशा वेळी कोणतीही पीडित महिला राज्य महिला आयोगाकडेच मदतीसाठी जाते. इथे अशी कोणतीच संस्था नाही जिथे महिला आपली बाजू मांडू शकतील. मला हे कळत नाही की सरकार इतके असंवेदनशील कसे आहे की, त्यांनी महिला आयोगाची स्थापना केलेली नाही. जर ते असते तर महिलांना न्याय मिळाला असता.
महाराष्ट्रात राज्य महिला आयोग नसल्याने आम्हाला वेळोवेळी पोलिसांची मदत घ्यावी लागली. महिलांच्या बाबतीत संवेदनशील आहे असे म्हणणारे सरकार हे पूर्णपणे असंवेदनशील आहे. यांना महिलांबाबत कोणतीही चिंता नाही आहे. राज्य सरकारने याबाबत उत्तर द्यायला हवे, या शब्दांत महिला आयोगाच्या सदस्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले.