Sanjay Raut : संजय राऊतांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; पत्रात काय?
(Sanjay Raut) संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे की, 'महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची व आमदारांच्या राडेबाजीची रोज नवीन प्रकरणे समोर येत आहेत. भ्रष्टाचाराच्या संदर्भात राज्यात एक प्रकारची अनागोंदी माजली असून महानगरपालिकांतील प्रशासक व अधिकारी संगनमताने शासकीय तिजोरीची लूट करीत आहेत. अहिल्यानगर महानगरपालिकेतले प्रकरण धक्कादायक आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी, ठेकेदारांच्या गैंग यांनी महायुती सरकारच्या आमदार असणाऱ्या संग्राम जगताप यांच्या वरदहस्ताने संगनमत करत कटकारस्थान रचून अहिल्यानगर शहरातील सन २०१६ ते २०२० या चार वर्षांच्या कालावधीत ७७६ रस्त्यांच्या सुमारे रुपये ३५० ते ४०० कोटींहून अधिक रकमेचा महाघोटाळा करत भ्रष्टाचार केला आहे. हा अहिल्यानगरमधील आजवरचा सर्वात मोठा स्कॅम असून संबंधित लोक सरकारला समर्थन देत असल्याने हा स्कॅम दडपला जात आहे.'
'हा घोटाळा अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी पुराव्यानिशी उघड केला आहे. महायुतीचे सरकार राज्यात सत्तेत असताना दि. ८ मे २०२३ रोजी त्यांनी पहिली तक्रार अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आयुक्तांसह मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, तसेच आपल्याच सरकारमधील महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी आजवर नगर विकास विभाग, गृह विभाग तसेच या मनपाला कामांची बिले अदा करण्यात पूर्वी आवश्यक असणारे, दिले जाणारे गुणवत्तांचे प्रमाणपत्र ज्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत असणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतन, अहिल्यानगर या संस्थेच्या वतीने दिले जाते त्यांच्याकडे वारंवार लेखी पाठपुरावा केला.'
'काळे यांच्या तक्रारीवरून आणि केलेल्या आंदोलनानंतर शासकीय तंत्रनिकेतन, अहिल्यानगर यांनी दि. १६/०६/२०२३ रोजी पाच सदस्य समिती गठीत केली. या समितीने सर्व उपलब्ध कागदपत्र, पुरावे यांची सखोल पडताळणी केली असता सुमारे ७७६ रस्त्यांच्या कामांची शेकडो कोटींची बिले लाटण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, मनपा सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर अभियंता, इतर अभियंते, या विभागातील कर्मचारी, आपल्या महायुतीच्या आमदारांचे कार्यकर्ते असणारे शेकडो ठेकेदार यांनी राजकीय वरदहस्तातून संगनमत करून कटकारस्थान करून शासकीय तंत्रनिकेतन, अहिल्यानगरच्या काही भ्रष्ट लोकांना हाताशी धरून शासनाची संस्था असणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतनच्या नावाने बनावट लेटरहेड, बनावट शिक्के, राजपत्रित असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावांचे बनावट शिक्के, त्यांचा खोट्या सह्या करून हा महाघोटाळा केला आहे.'
'या घोटाळ्यामध्ये महायुतीच्या विद्यमान आमदारांसह आज आपल्याला समर्थन देणाऱ्या शिंदे गटात पक्षात असणाऱ्या तत्कालीन महापौर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने महापौर असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या महापौर, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे. या महाघोटाळ्याचा मलिदा भ्रष्ट नेते, अधिकारी यांनी संगनमत करत लाटला आहे.
अहिल्यानगर शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना भ्रष्ट व्यवस्थेमुळे रस्त्यांसारख्या मूलभूत सेवेला मुकावे लागले आहे. हा सर्वसामान्य जनतेच्या तिजोरीवर घातलेला दरोडा आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ रोजी अँटी करप्शनच्या राज्याच्या मा. अप्पर पोलीस महासंचालक यांच्याकडे फिर्याद दाखल केली होती. मात्र अँटी करप्शननेदेखील राजकीय दबावातून भ्रष्ट लोकांना वाचवण्यासाठी भ्रष्टाचाऱ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल केलेले नाहीत.
या चार वर्षांव्यतिरिक्त सन २०२० ते २०२३ या कालावधीतदेखील अशाच प्रकारच्या मोडस् ऑफ ऑपरेडी-कार्यप्रणालीच्या माध्यमातून सुमारे २०० ते ३०० कोटी रुपयांच्या तितक्याच रकमेचा घोटाळा झाला असण्याची दाट शक्यता आहे. याबाबत देखील तक्रार करूनही कोणतीही चौकशी जाणीवपूर्वक भ्रष्टाचार दडपण्याच्या हेतूने करण्यात आलेली नाही.'
'अहिल्यानगर शहराचे नागरिक रस्त्यांच्या समस्येमुळे मेटाकुटीला आले आहेत. सरकार त्यांना रस्तेही देऊ शकत नसेल तर अशा सत्तेचा काय उपयोग, गुन्ह्याची व्याप्ती पाहता या प्रकरणातील आरोपींची संख्या ही प्रचंड मोठी आहे. जनतेची लूट करणाऱ्या सरकारच्या वरदहस्ताने अशा साखळी पद्धतीने भ्रष्टाचार करणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांची जागा ही तुरुंगात असायला हवी.
अहिल्यानगरच्या जनतेच्या व्यापक हितासाठी आपण या भ्रष्टाचाराची दखल घेत तत्काळ सर्व दोर्षीवर उपलब्ध चौकशी अहवालाच्या आधारे गंभीर स्वरूपाचे फौजदारी खटले दाखल करून दोर्षीना तत्काळ अटक करत त्यांची तुरुंगात रवानगी करावी.' असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.