BMC Elections
SHAHAJI BAPU PATIL ENTRY IN MUMBAI POLITICS ADDS HEAT TO BMC ELECTION BATTLE

BMC Elections: मुंबईच्या रणांगणात शहाजीबापूंची एंट्री; भाषेची धार, राजकारणाची ठिणगी

Shahaji BapuPatil: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहाजीबापू पाटील यांची आक्रमक एंट्री झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत असताना राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दयुद्धाला धार चढताना दिसते आहे. या रणधुमाळीत आता शहाजीबापू पाटील यांनी थेट उडी घेतली असून, त्यांच्या प्रवेशाने ठाकरे गटासाठी ही निवडणूक अधिकच आव्हानात्मक ठरणार आहे. ग्रामीण भाषेचा ठसका, थेट विधानं आणि आक्रमक भूमिका हे शहाजीबापूंचे ओळखीचे शस्त्र. तीच शस्त्रं घेऊन ते आता मुंबईच्या राजकारणात उतरले आहेत. “काय ती झाडी, काय ते डोंगर…” अशा भाषेतून राज्यभर लोकप्रिय ठरलेले शहाजीबापू आता मुंबईत प्रचाराचा झंझावात उभा करण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महायुतीच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. ठाकरे गटाच्या टीकेला सौम्य शब्दांत नव्हे, तर त्याच ताकदीने उत्तर देण्याची रणनीती महायुतीने आखली आहे.

संजय राऊत हे केवळ निमित्त?

शहाजीबापूंनी संजय राऊत यांना थेट लक्ष्य करत केलेली टीका ही केवळ वैयक्तिक पातळीवरची नाही. ती ठाकरे गटाच्या एकूणच आक्रमक राजकारणाला दिलेले उत्तर आहे. “कस्पटासारखं उडवून लावीन,” हा शब्दप्रयोग जितका आक्रमक आहे, तितकाच तो आजच्या निवडणूक संस्कृतीचं वास्तवही दाखवतो. मुद्द्यांपेक्षा भाषेला महत्त्व देण्याची ही लढाई आहे आणि त्यात शहाजीबापू स्वतःला मागे ठेवणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

ठाकरे बंधू आणि बदलते राजकीय समीकरण

मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं जवळ येणं हे अनेकांना राजकीयदृष्ट्या धक्कादायक वाटलं. मात्र शहाजीबापूंच्या मते, हा निर्णय राज ठाकरेंसाठी राजकीय आत्मघात ठरू शकतो. स्वतंत्र राजकीय ओळख असलेले राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंच्या सावलीत जातील आणि त्याचा फायदा उद्धव ठाकरे घेतील, असा दावा शहाजीबापूंनी केला आहे. ही टीका फक्त व्यक्तीवर नाही, तर मुंबईतील मराठी मतांच्या गणितावर केलेले भाष्य आहे.

मुंबई आणि भावनिक राजकारण

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा मुद्दा निवडणुकीपुरता उकरून काढला जातो, हा आरोप नवा नाही. मात्र शहाजीबापूंनी यावर घेतलेली भूमिका अधिक टोकाची आहे. “मुंबईसाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे,” हे सांगताना त्यांनी भावनिक राष्ट्रवादाचा सूर लावला. हा सूर मतदारांच्या मनात खोलवर रुजवण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसते. विकासाच्या मुद्द्यांबरोबरच भावनिक प्रश्नांवर नियंत्रण मिळवण्याची ही रणनीती आहे.

सांगोला विजय शब्दांमागची ताकद

शहाजीबापूंच्या आक्रमक भाषणामागे केवळ शब्दांची ताकद नाही, तर सांगोला नगरपरिषद निवडणुकीचा ठोस विजय आहे. विरोधकांची संयुक्त आघाडी असतानाही २० पैकी १७ जागांवर मिळवलेला विजय हे त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारे यश आहे. त्यामुळे मुंबईत बोलताना ते आत्मविश्वासाने बोलत आहेत, हे नजरेआड करता येणार नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com