Supriya Sule
Supriya Sule

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, पत्रात काय?

सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Supriya Sule) सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, 'महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी काल मंगळवार दि. 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान पार पडले. मतदान शेवटच्या टप्प्यात असताना राज्यातील काही भागांमध्ये दोन गटांमध्ये तुंबळ हाणामाऱ्या झाल्याची दृश्ये वृत्तवाहिन्यांवर दिसली. देशाला दिशा दाखविणारे राज्य अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्रातील निवडणूकीची ही धक्कादायक परिस्थिती पाहून मनाला अतिशय दुःख आणि वेदना झाल्या. आपल्या महाराष्ट्रात हे घडूच कसे शकते अशी भावना याक्षणी माझ्या मनात आहे. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कृतीशील विचारांचा वारसा सांगणारी भूमी आहे. या भूमीने सदैव लोकशाही मूल्यांचा पुरस्कार केला असून ती रुजविण्यासाठी राष्ट्राला दिशा देण्याचे काम केले आहे. सशक्त लोकशाही असणाऱ्या, प्रबोधनात्मक आणि संविधानात्मक विचारांची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात लोकशाहीचा सर्वोच्च उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणूकीच्या दरम्यान अशा पद्धतीने तुंबळ हाणामाऱ्या होतात, हे सर्वथा अयोग्य, अनुचित आणि राज्याच्या लौकीकास न शोभणारे आहे.'

'अस्वस्थ करणारी बाब म्हणजे निवडणूका शांततामय मार्गाने, निर्भय वातावरणात आणि निष्पक्ष व्हाव्या याची जबाबदारी असणाऱ्या निवडणूक आयोगाने या हाणामाऱ्यांच्या घटनांवर कसलीही कारवाई केली नाही. वास्तविक निवडणूक आयोगाने या घटनांची स्वतःहून दखल घेऊन अशी कृत्ये करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणे अपेक्षित होते. सशक्त लोकशाहीत निवडणूकीच्या काळात अशा हाणामाऱ्या ते देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात होणे लोकशाही मूल्यांना गालबोट लावणारे आहे. राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस घसरत चाललेला असून पुढच्या पिढ्यांसाठी आपण कसला वारसा सोडून जाणार आहोत, असा प्रश्न यानिमित्ताने राज्यातील जनतेला पडला आहे.'

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, 'मुख्यमंत्री महोदय, आपण महाराष्ट्राचे प्रमुख आहात. राज्याची परंपरा, मूल्ये आणि प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळेच आपणास हे पत्र लिहित असून आपण राज्याच्या प्रतिष्ठेला, लौकीकाला काळीमा फासणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई कराल ही अपेक्षा आहे. लोकशाही व्यवस्थेचे पावित्र्य कायम राखण्यासाठी हे आवश्यक आहे. असे सुप्रिया सुळे यांनी पत्रात लिहिले आहे.

Summery

  • सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

  • 'मतदान शेवटच्या टप्प्यात असताना राज्यातील काही भागांमध्ये दोन गटांमध्ये तुंबळ हाणामाऱ्या झाल्याची दृश्ये वृत्तवाहिन्यांवर दिसली'

  • 'महाराष्ट्रातील निवडणूकीची ही धक्कादायक परिस्थिती पाहून मनाला अतिशय दुःख झाले'

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com