Uddhav Thackeray: “हा ठाकरेंचा शब्द आहे, बोगस मोदी गॅरंटी नाही”, नाशिकमधून उद्धव ठाकरे यांचा थेट हल्लाबोल
नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेकडून संयुक्त प्रचार सभा घेण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेत नाशिककरांना शिवसेना-मनसेच्या हाती सत्ता देण्याचं आवाहन केलं. "ही बोगस मोदी गॅरंटी नाही, ठाकरेंचा शब्द आहे," असं म्हणत भाजपवर टीका करत उद्धव ठाकरेंनी नाशिकचा उत्कर्ष घडवू, असं आश्वासन दिलं.
सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "गेल्या दोन वर्षांत ही चौथी सभा आहे. माझ्यासोबत भाऊ राज आणि संजय आहेत. जनता अपेक्षेने पाहतेय. राजने महापालिकेत केलेली कामं अभिमानाने सांगितली. शिवसेनेने नाशिक आणि मुंबईत काम केलं. दोन भाव एकत्र आले तर नाशिकचा कायापालट होईल." ते पुढे म्हणाले, "ठाकरे जे बोलतात ते करतात. ही छापलेली गॅरंटी नाही."
सत्ताधारी भाजपवर सडकून हल्ला चढवत ठाकरे म्हणाले, "बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या हुकूमशाहीविरोधात लोक रस्त्यावर उतरले, आपण शेपूट घालून बसणार का? ही लोकशाही नाही, झुंडशाही आहे. राहुल नार्वेकरसारखे अध्यक्ष निष्पक्ष राहिले पाहिजेत. भाजप घराणेशाहीचा आरोप करतो, पण नार्वेकर घरात तीन उमेदवार देतात. निवडणूक आयुक्त शेपूट घालून बसला आहे. मशाल हृदयात पेटली पाहिजे. हिंदुत्वाचा बुरखा नसता तर तपोवन कापलं नसतं, ताडोबात खाणीसाठी जागा दिली नसती."
भाषणाच्या शेवटी ठाकरे म्हणाले, "मुंबईत आम्ही करून दाखवलं. नाशिकची सत्ता द्या, सीबीएससी सुरू करू, वैद्यकीय महाविद्यालयं देऊ. जगातील स्वस्त प्रवास देणारी बीएसटीसारखी सुविधा देऊ. सत्ता द्या, नाशिकमध्ये बेस्टसारखी व्यवस्था करू." राज ठाकरे यांनीही नाशिकच्या व्यथा मांडल्या असून, ठाकरेंची ही संयुक्त सभा निवडणुकीत गेमचेंजर ठरेल, असा अंदाज आहे.
