वंदे भारतला चिपळुणात थांबा मिळावा; 'या' आमदाराची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी
निसार शेख, चिपळूण: कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते मडगाव दरम्यान हायस्पीड वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे. या रेल्वेला रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी व खेड अशा दोनच ठिकाणी थांबा आहे. चिपळूण हे रत्नागिरी जिल्ह्याचे मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण असल्याने चिपळूण येथे वंदे भारत रेल्वेला थांबा मिळावा, यासाठी आमदार शेखर निकम यांनी सोमवारी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली.
वंदे भारत ट्रेनला थांबा मिळावा, यासह अन्य विषयांवर यावेळी शेखर निकम यांनी रावसाहेब दानवे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी अजित पवार राष्ट्रवादीचे बाबाजीराव जाधव, जिल्हा बँक संचालक राजू सुर्वे, राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतराव, सामाजिक कार्यकर्ते संजीव अणेराव आदी उपस्थित होते. शेखर निकम यांच्या निवेदनावर रावसाहेब दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.