रत्नागिरीत अतिवृष्टीचा इशारा; चिपळूणमध्ये NDRF ची टीम दाखल

रत्नागिरीत अतिवृष्टीचा इशारा; चिपळूणमध्ये NDRF ची टीम दाखल

Published by :

रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या इशार्यानंतर सर्वच यंत्रणा संतर्क झाल्या आहेत.तसेच एनडीआरएफचे पथक आज चिपळूणमध्ये दाखल झाले.

चिपळूणमध्ये २२ जुलैला आलेल्या महापूरात हजारो नागरिकांचे हाल झाले होते. नागरीकांना पुरापासून वाचवण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले होते. परंतु सर्वच ठिकाणी पाणी साचल्याने एनडीआरएफच्या टीमला अडथळ्यांचा सामना करावा लागला. एनडीआरएफची टीम उशिरा दाखल झाल्यामुळे नागरिकांकडून प्रशासनावर टीकाही झाली होती.

रत्नागिरी जिल्ह्यात ९ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. चिपळूणमध्ये गेली १७ तास मुसळधार पाऊस कोसळत आहे. शहराच्या सखल भागात पाणी भरत असून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पाण्याचा निचरा होत आहे. परंतु प्रशासनाने 22 जुलैच्या महापुराचा धडा घेत पूर परिस्थिती हाताळण्यासाठी नियोजन केले आहे. शहरात विभागवार नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाणी भरण्यास सुरवात झाल्यानंतर भोंगा वाजवून सतर्कतेचा इशाराही दिला जात आहे.

दरम्यान आता रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर एनडीआरएफचे पथक आज चिपळूणमध्ये दाखल झाले. २५ जवानांसह आवश्यक ती यंत्रणा घेऊन हे पथक पुणेमार्गे चिपळूणमध्ये दाखल झाले आहे. चिपळूणमध्ये पुन्हा महापूर आल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी या पथकाची मोठी मदत होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com