वाशिम रेल्वे स्टेशनवर जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावरून मार्गक्रमण
गोपाल व्यास | वाशिम : रेल्वेरुळ ओलांडतांना अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडत आहेत. रेल्वे स्टेशनवर वारंवार सूचना करुनही नागरिक निष्काळीपणा दाखवतात आणि रेल्वे रुळ ओलांडताना अपघाताला बळी पडतात. असेच चित्र वाशिम स्टेशनवर सर्रास पाहायला मिळत असून काही नागरिक आपला जीव धोक्यात घालून रेल्वेरूळ ओलांडत आहे.
तर एक महिला आपल्या चिमुकल्याला घेऊन रेल्वेरूळ ओलांडतानाच दृश्य लोकशाही न्युजच्या कॅमेऱ्यात कैद झाल्याचं पाहायला मिळत आहे. रेल्वे स्टेशनवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे महत्त्वाचे असतांना याकडे दुर्लक्ष केल्याच पाहायला मिळत आहे.
रेल्वे प्रशासनाने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून फलाटाच्या मध्यभागी बांधलेल्या पादचारी पुलाचा वापर नागरिकांच्या येण्या-जाण्यासाठी केला आहे. मात्र, नागरिक पादचारी पुलाचा वापर न करता रेल्वे रूळावरून येजा करतात. एखादी रेल्वे दुसऱ्या फलाटावर आली तर पादचारी पुलावरून न जाता रूळावरून पळत रेल्वेत आपल्याला जागा मिळावी म्हणून पळत सुटतात. मात्र, त्यावेळी अपघाताची मोठी घटना सुद्धा घडू शकते.
भरधाव रेल्वे येत असताना अथवा रेल्वे स्टेशनवर रूळ ओलांडू नये अशा सूचना वारंवार आपण एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानानं सोडून देतो. वेळ वाचवण्याच्या नादात हा शॉर्टकट केव्हा जीवघेणा ठरेल यासाठी प्रत्येक नागरिकांनी खबरदारी घेऊन रेल्वे रूळ ओलांडू नये, पादचारी पुलाचा वापर करावा जेणेकरून घडणाऱ्या घटनांना आळा बसेल.