17 दिवस आंदोलन, मुख्यमंत्री स्वतः उपोषण सोडवायला; कोण आहेत मनोज जरांगे पाटील?

17 दिवस आंदोलन, मुख्यमंत्री स्वतः उपोषण सोडवायला; कोण आहेत मनोज जरांगे पाटील?

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल 17 दिवस उपोषण केले.
Published on

मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल 17 दिवस उपोषण केले. पोलिसांच्या कारवाईमुळे काही दिवसांतच हे आंदोलन राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलं आणि मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागली. यानंतर अनेक वेळा सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटलांची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. अखेर सरकारच्या प्रयत्नांना यश आले. आणि राज्य सरकारला एका महिन्याचा वेळ देत मुख्यमंत्र्यांनी आपले उपोषण सोडवावे, अशी मागणी त्यांनी केली. आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्युस घेत जरांगे पाटलांनी आपले उपोषण मागे घेतले. 17 दिवसांचे उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील आहेत तरी कोण? हे जाणून घ्या.

17 दिवस आंदोलन, मुख्यमंत्री स्वतः उपोषण सोडवायला; कोण आहेत मनोज जरांगे पाटील?
MLA disqualification : ठाकरे गटाकडून नवी याचिका दाखल

कोण आहेत मनोज जरांगे पाटील?

- मनोज जरांगे पाटील यांचे वय 41 वर्षे असून मूळ गाव शहगड आहे.

- ते मराठा मोर्चाचे समन्वयक असून गेले 20 वर्षे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.

- 2012 साली शहागडमध्ये आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 7 दिवसाचं आमरण उपोषण केले.

- 2013 साली शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी काढली.

- जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी सहा दिवस उपोषण केले होते.

- अंबड तहसील कार्यालयासमोर तब्बल 11 वेळा त्यांनी उपोषण केले आहे.

- मागील 2 वर्षात जालन्यातील साष्टपिंपळगाव, भांबेरी, वडीकाळ्या आणि आता अंतरवली सराटीत पाच दिवसांपासून उपोषण केले.

काय झाले आतापर्यंत?

29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषणाची हाक दिली. यादरम्यान अनेकदा प्रशासन आणि आंदोलकामध्ये चर्चा झाली. मात्र, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक ठाम होते. उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याने पोलिसांकडून उपोषण थांबवण्याचं प्रयत्न सुरु केले. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. याचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात आला होता. यानंतर सरकारने घोषणा करत नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा जीआर काढला.

मात्र, सरसकट आंदोलनावर जरांगे पाटील ठाम होते. यानंतर अखेर उपोषणाच्या 17 व्या दिवशी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. जीआरमधील वंशावळीचा उल्लेख काढून टाकावा. ज्या अधिकाऱ्यांनी लाठीमार केला. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावं. मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले ते मागे घेणं अशा मागण्या करत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान, एका महिन्यात मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com