Pune : "माझी जगायची इच्छा संपली…”, म्हणत 21 वर्षीय IT कंपनीत काम करणाऱ्या तरुणीचं टोकाचं पाऊल, चिठ्ठीतून कारणही सांगितलं
राज्यात आत्महत्येचे वाढते प्रमाण चिंतेची बाब ठरत आहे. पुण्यातील हिंजवडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. 25 वर्षीय आयटी इंजिनिअर अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबीरे हिने 21 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ‘माझी जगायची इच्छा संपली आहे’ असे स्पष्ट शब्दात लिहिलेल्या चिठ्ठीमुळे ही आत्महत्या नैराश्यातून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही घटना 31 मे रोजी पहाटेच्या सुमारास ‘द क्राऊन ग्रीन’ या सोसायटीत घडली. अभिलाषा आयटी पार्कमधील एका कंपनीत नोकरी करत होती. ती आपल्या मैत्रीणीच्या सोसायटीत दुचाकीवरून आली व लिफ्टने 21 व्या मजल्यावर गेली. काही मिनिटांतच तिने उडी घेऊन आपलं आयुष्य संपवलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुचाकीच्या आधारे तिची ओळख पटवली. तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात करण्यात आले.
तपासात सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये “सॉरी, मला माफ करा. मी हे स्वेच्छेने करत आहे. माझी आता जगायची इच्छा राहिलेली नाही,” असे तिने लिहिले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आत्महत्येमागे नैराश्याचे कारण असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अभिलाषाची खोली तपासून काही महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. तिच्या बेडवर रक्ताचे डाग असलेले नॅपकिन, कपडे, उशीचे कव्हर आणि मोबाईल पोलिसांच्या ताब्यात घेतले गेले. मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार, अभिलाषा रात्री एक वाजेपर्यंत रूममध्ये होती. सकाळी पाचला ती दिसली नाही आणि नंतर तिचा फोन बंद येऊ लागला. काही वेळातच पोलिसांनी ही दु:खद घटना तिच्या मैत्रिणीला कळवली. या प्रकरणात कोणताही घातपात किंवा संशयास्पद बाब आढळून आलेली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.