Kashi Vishwanath Corridor | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काशीत शिवाजी महाराजांचा उल्लेख, म्हणाले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं लोकार्पण केले. या लोकार्पण सोहळ्यानंतरच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आहे. या ठिकाणी औरंगजेब आला, तर शिवाजी देखील उभे राहतात, असं मत मोदी म्हणाले. याशिवाय मोदींनी अनेक भारतीय पराक्रमांचाही उल्लेख केला.
औरंगजेबाने केलेले अत्याचार त्याच्या दहशतीची साक्ष देतात. त्याने तलवारीच्या बळावर येथे बदल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या देशाच्या मातीत इतर जगापेक्षा काही वेगळं आहे. "येथे औरंगजेब आला तर शिवाजी देखील उभे ठाकले. कुणी सालार मसूद आला तर राजा सुहेलदेव यांच्यासारखे वीर योद्धे आपल्या एकतेची ताकद दाखवून देतात. इंग्रजांच्या काळात देखील काशीच्या लोकांनी हेस्टिंगचे काय हाल केले होते हे येथील लोकांना माहिती आहे," असंही मोदींनी नमूद केलं.
मोदी पुढे म्हणाले, आजचा भारत त्या हीन भावनेतून बाहेर पडत आहे. आजचा भारत केवळ सोमनाथ मंदिराचं सौंदर्यीकरणच करत नाही, तर समुद्रात हजारो किलोमीटर ऑप्टिकल फायबर देखील पसरवत असल्याचे ते म्हणाले. आजचा भारत केदारनाथचा जिर्णोद्धारच करत नाही, तर स्वतःच्या हिमतीवर अंतराळात भारतीयांना पाठवण्याच्या तयारीत आहे. आजचा भारत केवळ अयोद्ध्येत प्रभु रामांचं मंदीरच बनवत नाही, तर देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज देखील बनवत आहे," अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली.