‘चंपाने सोमय्यांसह टरबूजाच्या खापा केल्या तरी टरबूज गोड लागणार नाही’; राष्ट्रवादीच्या आमदाराचा फडणवीसांवर निशाणा
मंगेश जोशी, जळगाव | राष्ट्रवादी कॉग्रेस नेते आणि अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जातायत. "चंपाने सोमोय्यांना हाताशी धरून टरबूजाच्या कितीही खापा केल्या तरी राज्यातील जनतेला टरबूज गोड लागणार नाही, अशी घणाघाती टीका करत अनिल पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
मंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेली कारवाई ही सूड भावनेतून झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या वतीने ठिकठिकाणी भाजपचा निषेध केला आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर चे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी देखील भाजपवर जोरदार हल्ला चढवला. चंपाने सोमोय्यांना हाताशी धरून टरबूजाच्या कितीही खापा केल्या तरी राज्यातील जनतेला टरबूज गोड लागणार नाही, अशी घणाघाती टीका करत अनिल पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
ईडी कार्यवाही हे चंद्रकांत पाटील यांचे हे षडयंत्र आहे. किरीट सोमय्यांना हाताशी धरून हे सरकार पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कशाही प्रकारे महाराष्ट्र सरकार पाडण्याचा केंद्र सरकारचा अट्टाहास असल्याचे म्हणत भाजपावर टीका केली आहे. नवाब मलिक यांच्या पाठीशी आघाडीतली सर्व आमदार खंबीरपणे उभे असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.