विधानसभेत 'पाटीलकी'... तब्बल 25 पाटील विधानसभेत
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. मात्र, महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून अद्यापही पेच कायम आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदावरील आपला दावा सोडला आहे. तर आज राष्ट्रवादी काँग्रेचसे नेते अजित पवार यांनीही पत्रकार परिषद घेत महत्त्वाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री कुणीही झाले तरी विधानसभेत पाटील मंडळींचेच वर्चस्व राहणार आहे. मतदारांनी यंदा पाटील आडनावाच्या 25 जणांना विधानसभेत पाठवले आहे. विशेष म्हणजे, या पाटील आडनावांच्या यादीत काँग्रेसचा एकही आमदार नाही.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला 230 जागा मिळाल्या. त्यात भाजपला 132, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या 41 जागांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 30 जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत 288 पैकी केवळ 46 जागा मिळाल्या. या सर्व पक्षांचे मिळून पाटील आडनावाचे एकूण 25 आमदार निवडून आले आहेत.
भाजपचे पाटील आमदार : राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी). राणाजगजितसिंह पाटील (तुळजापूर), संभाजी पाटील निलंगेकर (निलंगा), रवीशेठ पाटील (पेण), चंद्रकांतदादा पाटील (कोथरूड), राघवेंद्र पाटील (धुळे ग्रामीण)
शिवसेनेचे पाटील आमदार : अशोक पाटील (भांडुप पश्चिम), किशोर पाटील (पाचोरा), अमोल पाटील (एरंडोल), गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर).
राष्ट्रवादी काँग्रेसचे पाटील आमदार : अनिल पाटील (अंमळनेर), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), प्रतापराव पाटील चिखलीकर (लोहा), मकरंद जाधव पाटील (वाई), सचिन पाटील (फलटण), बाबासाहेब पाटील (अहमदपूर)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाटील आमदार : रोहित पाटील (तासगाव-कवठे महंकाळ), जयंत पाटील (इस्लामपूर), नारायण पाटील (करमाळा), अभिजित पाटील (माढा)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पाटील आमदार : कैलास घाडगे पाटील (उस्मानाबाद), डॉ. राहुल पाटील (परभणी) या प्रमुख पक्षांसह शिरोळ मतदारसंघातून राजर्षी शाहू विकास आघाडीचे राजेंद्र पाटील यड्रावकर आणि चंदगड मतदारसंघातून अपक्ष लढलेले शिवाजी पाटील
तर काँग्रेसच्या या यादीत पाटील आडनावाचा एकही आमदार नाही. या पाटील मंडळींचा विधानसभेत आवाज घुमणार असून, राज्याच्या विकासासाठी तो किती मोलाचा ठरणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.