छत्रपती संभाजीनगरमध्ये देशातील पहिले 'वॉटर लिटरसी सेंटर'; 5 मित्रांनी 12 लाख खर्चून उभारला जलसंवर्धनाचा आदर्श प्रकल्प

छत्रपती संभाजीनगरमध्ये देशातील पहिले 'वॉटर लिटरसी सेंटर'; 5 मित्रांनी 12 लाख खर्चून उभारला जलसंवर्धनाचा आदर्श प्रकल्प

पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी आणि जलसाक्षरतेचा संदेश देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरातील पाच तरुण मित्रांनी एक प्रेरणादायक पाऊल उचलले आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी आणि जलसाक्षरतेचा संदेश देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरातील पाच तरुण मित्रांनी एक प्रेरणादायक पाऊल उचलले आहे. घरात नळ उघडताच सहज मिळणाऱ्या पाण्याच्या सुविधेमुळे व्यथित होऊन त्यांनी स्वतःच्या खिशातून तब्बल 12 लाख रुपये खर्च करत 18 एकर क्षेत्रावर देशातील पहिले 'वॉटर लिटरसी सेंटर' उभारले आहे. या सेंटरच्या माध्यमातून पाणी बचतीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले जात आहे. धावते पाणी थांबवणे आणि थांबलेले पाणी जमिनीत मुरवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

पाण्याच्या थेंबासाठी झगडणाऱ्यांना दिला दिलासा

इकोनिड्स फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रियानंद आगळे, प्रवीण तायल, सौरभ देसरडा, निखिल खिवंसरा आणि विनीत पिट्टी यांनी एकत्र येऊन या उपक्रमाची संकल्पना पुढे आणली. भाषणांपुरती मर्यादा न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून लोकांपर्यंत पाण्याचे महत्त्व पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी केला आणि यातूनच 'वॉटर लिटरसी सेंटर'चा जन्म झाला.

एसआरपीएफचे सहकार्य: प्रकल्पाला मिळाली उभारी

सेंटरसाठी जागा मिळवण्यासाठी सातारा राज्य राखीव पोलिस दल (SRPF) पुढे सरसावले. आयजी चिरंजीव प्रसाद आणि कमांडेंट विक्रम साळी यांच्या पुढाकाराने जागा उपलब्ध झाली आणि जवानांनी श्रमदानही केले. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांत प्रकल्प पूर्णत्वास गेला.

जलसंधारणाची प्रभावी तंत्रे

'वॉटर लिटरसी सेंटर'मध्ये विविध पद्धतींनी पाणी साठवण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले आहे:

पाझर तलाव: एका वेळेस 13.65 दशलक्ष लिटर पाणी साठवणाऱ्या दोन तलावांची निर्मिती. वर्षभरात साधारण 40 दशलक्ष लिटर पाणी जमिनीत झिरपते.

सीसीटी (Continuous Contour Trenches): डोंगर उतारावर 500 मीटर लांबीचे चर खोदून 8 लाख लिटर पाणी मुरवले जाते.

गॅबियन बंधारे: लोखंडी जाळीत दगड भरून बनवलेले बंधारे पाण्याचा वेग कमी करून भूजल वाढीस मदत करतात.

गली प्लंबिंग: नाले आणि ओढ्यांमध्ये मातीची धूप रोखण्यासाठी 3 दगडी बंधारे बांधले.

यामुळे दरवर्षी साधारण 78 दशलक्ष लिटर पाणी जमिनीत झिरपत असून भूजल पातळी वाढत आहे.

या केंद्रात 10,000 झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत स्थानिक प्रजातींची 100 झाडे लावण्यात आली असून, एसआरपीएफ जवान पाणी देण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. डोंगरावर टाक्या बसवून पाइपलाइन केली आहे आणि एक रोपवाटिकाही कार्यरत आहे. भविष्यात येथे पाणी परिषद, थिएटर आणि ग्रंथालय उभारण्याची योजना आहे. प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य असून, तज्ञांमार्फत. मार्गदर्शनही दिले जाणार आहे.

2 मे रोजी सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन

2 मे रोजी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते वॉटर लिटरसी सेंटरचे उद्घाटन होणार आहे. त्यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त 71 वृक्षांचेही रोपण केले जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com